संपत्ती पुढे नाते तुटले ! अर्धा एकर शेतीसाठी भावाने केला भावाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 05:57 PM2021-04-28T17:57:55+5:302021-04-28T17:58:54+5:30
crime in Hingoli : अर्धा एकर शेती मला का कमी दिली, याचा जुना वाद दोघां भावात होता.
कुरुंदा : माझ्या हिस्साला अर्धा एकर शेत कमी आली, या शेतीच्या वादातून भावाने भावाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना २७ एप्रिल रोजी ५ वाजता सोमठाणा येथे घडली आहे. याप्रकरणी २८ एप्रिल रोजी पिता, पुत्राविरोधात कुरूंदा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसमत तालुक्यातील सोमठाणा येथील किशन तातेराव जगताप व गणेश तातेराव जगताप हे दोघे सख्ये भाऊ आहेत. यांच्यामध्ये अर्धा एकर शेती मला का कमी दिली, याचा जुना वाद दोघां भावात होता. २७ एप्रिल रोजी आरोपी गणेश तातेराव जगताप, त्यांचा मुलगा अंकुश गणेश जगताप यांनी संगनमत करून शेतीच्या जुन्या वादावरून वाद घालून किशनला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत, त्यांच्या डोक्यात, तोंडावर, छातीवर गंभीररीत्या दगडाने ठेचून मारहाण केली. त्यांना गिरगाव आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्या आगोदरच मुत्यू झाला. या घटनेमुळे सोमठाणा येथे खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी फिर्यादी मयताचा मुलगा डॉ. अतुल जगताप यांच्या तक्रारीवरून आरोपी अंकुश गणेश जगताप, गणेश तातेराव जगताप याच्याविरूध कुरूंदा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताचा पुतण्या अंकुशला पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सपोनि सुनील गोपीनवार, फाैजदार सविता बोधनकर करीत आहेत.