हिंगोली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी रात्रीला पावसाने हजेरी लावली. काही भागात तुरळक सरी कोसळल्या तर काही भागात मध्यम पाऊस झाला. शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास हिंगोली शहरासह जिल्ह्यातील औंढा, डिग्रस कऱ्हाळे, कौठा, कळमनुरी, पोतरा, वाकोडी, फाळेगाव, कनेरगाव, सवना या भागात पावसाने हजेरी लावली. तर वसमत, कौठा, गोरेगाव, आंबा, कडोळी, जवळा पांचाळ या भागात वादळी वारे वाहत होते.
या वादळी वाऱ्यामुळे यंदा आंब्याचा बहर झडत असून झाडाखाली कैऱ्यांचा सडा पडत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर यंदा आंबा मिळणे दुरापास्त होणार आहे. त्यातच अनेक शेतकऱ्यांचा गहू काढणीत आहे. काहींनी हरभऱ्याच्या सुड्याही तशाच झाकून ठेवल्या. तर काही जण काढणीसाठी हात लावायच्या तयारीत असले की, पावसामुळे नुकसान होत आहे. रब्बी ज्वारीलाही याचा फटका बसत आहे. हळदीच्या काढणीतही या पावसामुळे व्यत्यय येत असल्याचे चित्र आहे. पपई, केळीचेही काही भागात नुकसान होत आहे. या प्रकारामुळे शेतकरी मेटाकुटीला आहे.