जिल्ह्यातील वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळेतील २५ टक्के राखीव जागेवर प्रवेश देण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. २५ टक्के मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यातील ७९ शाळांची निवड करण्यात आली असून यात ५३० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी ३ मार्चपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस सुरवात झाली. अर्ज सादर करण्यास पालक सरसावले असताना मागील आठवड्यात ओटीपीची तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे पालकांना अर्ज सादर करताना अडथळा निर्माण होत होता. आता ही अडचण दूर झाली असून ऑनलाईन अर्ज सादर करता येत आहेत. १८ मार्चपर्यंत ५७३ ऑनलाईन अर्ज आले आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २१ मार्च असून आता केवळ चारच दिवस उरले आहेत. ओटीपीच्या तांत्रिक अडचणीमुळे काही दिवस अर्ज भरता आले नसल्याने अर्ज भरण्यास आणखी आठ दिवस तरी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी पालक करीत आहेत. दरम्यान, अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना पालक दिसून येत आहेत.
मोफत शाळा प्रवेश प्रक्रिया पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST