वसमत (जि. हिंगोली) : खरीप हंगामाची तयारी केली असली तरी पेरणीसाठी बैलजोडी मिळत नाही, या चिंतेतून तालुक्यातील चोंडी (बहिरोबा) येथील महिला शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना १४ जून रोजी घडली.
तालुक्यातील चोंडी (बहिरोबा) येथील महिला शेतकरी स्वाती मुंजाजी जाधव यांनी खरीप हंगामाची तयारी पूर्ण केली. परंतु पेरणीसाठी बैलजोडी मिळत नाही, पेरणीस उशिर होत आहे याच्या तणावात त्या होत्या. यातूनच या शेतकरी महिलेने १४ जून रोजी सायंकाळी सहा ते सात वाजेदरम्यान आखाड्यावरील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती कळताच कुरुंदा पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. याप्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रकरणी १८ जून रोजी महिला शेतकऱ्याचे पती मुंजाजी भाऊराव जाधव यांनी फिर्याद दिली असून कुरुंदा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.