आजपासून एसटीची चाके फिरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:28 AM2021-03-08T04:28:30+5:302021-03-08T04:28:30+5:30
हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागताच, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी १ मार्च ते ७ मार्चदरम्यान संचारबंदी लागू केली ...
हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागताच, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी १ मार्च ते ७ मार्चदरम्यान संचारबंदी लागू केली होती. दरम्यान, जिल्ह्यातील तिन्ही आगारांतील बसेसची चाके थांबली होती. सोमवारपासून संचारबंदी उठविली जाणार असल्याने, तिन्ही आगारांतील बसेस सुरू होतील, अशी माहिती आगारप्रमुख पी.बी. चौतमल यांनी दिली.
मागील पंधरा-वीस दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे जिल्ह्यातील हिंगोली, वसमत आणि कळमनुरी आगारांतील बसेस बंद होत्या. दरम्यान, पर जिल्ह्यांतून येणाऱ्या बसेस सुरू होत्या. या बसेसमधील प्रवाशांची अँटिजन तपासणी केल्याशिवाय त्यांना बस स्थानकातून जाऊ दिले जात नव्हते. ३ मार्चपासून तर पर जिल्ह्यातील बसेस शहर थांब्यावर न उभ्या करता थेट बस स्थानकातच आणल्या जात होत्या. तसे जिल्हा प्रशासनाने सर्वच आगारांना सूचनाही केली होती. ८ मार्चपासून जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनुसार सोलापूर, हैदराबाद, औरंगाबाद, बीड, लातूर आदी लांब पल्ल्याच्या बसेससह जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण भागातील बसेस सुरू करण्यात येणार आहेत.
मास्कचा वापर करावा; महामंडळाचे आवाहन
जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार, सर्वच ठिकाणच्या बसेस सुरू करण्यात येणार आहेत. प्रवाशांनी प्रवास करतेवेळेस विनामास्क बसेसमध्ये बसू नये. बसमध्ये चढतेवेळेस सामाजिक अंतर ठेवावे. वृद्ध व लहान मुलांनी प्रवास टाळावा. या दरम्यान, शाळा-महाविद्यालयाच्या (मानव विकास) बसेस सोडण्यात येणार नाहीत, असेही महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले.