‘मी पाॅझिटिव्ह’ म्हणणारे फिरताहेत बिनधास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:28 AM2021-04-15T04:28:28+5:302021-04-15T04:28:28+5:30
हिंगोली : कोरोना महामारी जेवढी ज्येष्ठांना समजली तेवढी तरुण मंडळींना अजूनही समजलेली दिसत नाही. ‘अरे मी पॉझिटिव्ह निघालो’ असे ...
हिंगोली : कोरोना महामारी जेवढी ज्येष्ठांना समजली तेवढी तरुण मंडळींना अजूनही समजलेली दिसत नाही. ‘अरे मी पॉझिटिव्ह निघालो’ असे गौरवाने सांगत सोबत आलेल्या मित्रांसोबत हस्तांदोलन करताना काही पॉझिटिव्ह पहायला मिळत आहेत.
२३ मार्च २०२० पासून कोरोना महामारीने सर्वत्र कहर माजविला आहे. दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. परंतु अजूनही कोराना महामारीला तरुण मंडळी सहजरित्या घेताना दिसत आहेत. कोरोना महामारीचा नायनाट करण्यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना मात्र तरुणांना त्याचे काहीच कसे वाटत नाही? हा प्रश्न पडत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व उपाययोजना करीत मास्कचा वापर करा, विनाकारण बाजारात फिरू नका, सॅनिटायझरचा वापर करा अशा सूचना दिल्या आहेत. पण या सूचनांकडेही काही तरुण मंडळी डोळेझाक करताना दिसत आहेत.
जिल्हा प्रशासनाने शहरातील बसस्थानक, रेल्वेस्टेशनवर अँटीजेन चाचण्या सुरू केलेल्या आहेत. काही जण तर हौसेखातर अँटीजेन चाचणीच्या ठिकाणी फिरताना आढळून येत आहेत. तपासणीनंतर पॉझिटिव्ह आल्यावर ‘मी पाॅझिटिव्ह आलो आहे’ असे म्हणत २४ दिवस आता बिनफिकीर झालो, असे म्हणत कोरोनाची चेष्टा उडवित आहेत.
दुसरीकडे परजिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांची तपासणी व्हायला पाहिजे. परंतु, ती तपासणीही होताना दिसत नाही. काही प्रवासी शक्कल लढवित शहरातील बसथांब्यावर उतरत घर गाठत आहेत. काही जण तर अँटीजेन चाचणी काय असते हे पहायला येत आहेत. तपासणी ठिकाणी नेमलेल्या पोलिसांनी काम नसताना आलेल्या प्रवाशांची विचारपूस करणे गरजेचे आहे. पण पोलीस कर्मचारी त्यांना थोपवत नाहीत. एवढेच काय महामंडळाचे कर्मचारी विनामास्क असलेल्या प्रवाशांशी गप्पाही मारत आहेत. आगार प्रमुखांनी काही कर्मचाऱ्यांना अँटीजेन तपासणीच्या ठिकाणी मदत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पण नेमलेले कर्मचारी वेळ निभावून नेत असल्याचे पहायला मिळत आहे.
कोरोना बाधितांना अटकाव होणे गरजेचे
ज्या ठिकाणी अँटीजेन, आरटीपीसीआर चाचण्या होत आहेत तेथील डॉक्टर मंडळी व इतर कर्मचाऱ्यांनी कोरोना बाधितांना उशीर न लावता कोरोना सेंटरवरील गाडी बोलवायला पाहिजे. पण एवढे असताना सेंटरवरील गाडी उशिरा येत आहे. त्यामुळे कोरोना बाधितांचे चांगलेच फावत आहे. मग काय? काही जण तर वेळेचा दुरूपयोग करून घेत आहे. कोरोना सेंटरची गाडी वेळेवर आल्यास कोरोना बाधित लवकर सेंटरवर पोहोचू शकतो, एवढे मात्र नक्की.