हिंगोली : नांदेडसह परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमधील ८ हजार ८६ घरे विजेच्या वापराबाबतीत स्वयंपूर्ण झाली असून, या घरांवर सौर पॅनेल बसवून संबंधित नागरिकांनी ३३ मेगावॅट विजेची निर्मिती केली आहे.
महावितरण कंपनीकडून ‘प्रधानमंत्री सूर्यघर योजना’ राबविली जात आहे. नांदेड परिमंडळात या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेची जनजागृतीही प्रभावीपणे केली जात आहे. या अंतर्गतच नांदेड जिल्ह्यात ३८५७ घरांच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल बसवले आहेत. त्यातून १७.०७ मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती केली जात आहे. परभणी जिल्ह्यात ३०२२ घरांवरील पॅनेल्समधून ११.२३ मेगावॅट तर हिंगोली जिल्ह्यात १२७७ घरांवर बसवलेल्या पॅनेल्सच्या माध्यमातून ४.५३ मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती केली जात आहे. नांदेड परिमंडळातील या तिन्ही जिल्ह्यांत मिळून ३२.८३ मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती होत आहे.
या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महावितरणने पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असणारी गावे ‘सोलार व्हिलेज’ म्हणून निवडली आहेत. घराच्या छतावरील सौर ऊर्जा पॅनेलद्वारे झालेली वीज निर्मिती घरगुती वापरापेक्षा अधिक असल्यास वीजबिल शून्यावर येते. तसेच महावितरणला ही वीज विकून उत्पन्न मिळवण्याची संधीही या योजनेत आहे. एक किलोवॅटच्या सौर वीज निर्मिती प्रकल्पातून महिन्याला २४० युनिट तर ३ किलोवॅटच्या प्रकल्पातून सर्वसाधारणपणे ३६० युनिट विजेची निर्मिती होऊ शकते.