अजय केशव डुकरे (१८) व सरस्वती देवीदास कऱ्हाळे (१७) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलाची नावे आहेत.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील गुंडलवाडी येथील अजय केशव डुकरे यांच्या शेतात हळद पिकाची काढणी सुरू आहे. त्यामुळे शेतात रात्रीच्या वेळी जागरण करण्यासाठी जावे लागते. त्यानुसार, ८ एप्रिलच्या रात्री १० वाजता घरी जेवण करून अजय शेतात जातो, असे सांगून घराबाहेर पडला. नेहमीच अजय शेतात जात असल्याने घराच्यांनी परवानगी दिली.
९ एप्रिल रोजी सकाळी काही शेतकऱ्यांना केशव डुकरे यांच्या शेतात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दोघे आढळून आले. ही माहिती गावात समजताच, ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी पाहणी केली असता, आत्महत्या केलेले अजय डुकरे व सरस्वती कऱ्हाळे असल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूरचे स.पो.नि. रवीकांत हुडेकर, जमादार भगवान वडकिले यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे.
दरम्यान, मयत अजय डुकरे हा परभणी येथील सैनिकी शाळेत शिक्षण घेत होता, तर सरस्वती कऱ्हाळे यांचे वडील गुंडलवाडी येथेच पाच वर्षांपासून सालदार म्हणून काम करतात. सरस्वती कऱ्हाळे यांचा विवाह ठरला होता. त्यासाठी तिचे कुटुंबीय त्यांच्या मूळ गावी राजदरी (ता. औंढा) येथे जाणार होते. या घटनेप्रकरणी नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती.