पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा कसा घालविणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:30 AM2021-05-12T04:30:48+5:302021-05-12T04:30:48+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलीस व आरोग्य प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. रात्रंदिवस काम करावे लागत असल्याने ...
हिंगोली : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलीस व आरोग्य प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. रात्रंदिवस काम करावे लागत असल्याने पोलीस व आरोग्याधिकारी, कर्मचाऱ्यांना ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. एरवी योग शिबिरे, मेडिटेशन शिबिरे घेतली जात असली तरी कोरोनाकाळात मात्र त्यांना खो बसला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा मासिक थकवा कसा घालविणार, हा प्रश्न निर्माण होत आहे.
कोरोना रोखण्यासाठी सर्वच विभागांचे कर्मचारी, अधिकारी पुढाकार घेत असले तरी यात आरोग्य व पोलीस प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. दररोज कोरोना रुग्ण आढळत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांचे काम वाढले आहे. जिल्हा प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत निर्बाध घातल्याने या नियमांची अमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आली आहे. यातून ताणतणाव वाढत असून मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे. दोन्ही विभागांच्या वतीने योग शिबिरे, ध्यानधारणा शिबिरे घेतली जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र कोरोनाच्या काळात या शिबिराला खो बसल्याने दिसत आहे. त्यामुळे कोरोनाकाळात पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा कसा घालणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.
जिल्ह्यातील एकूण पोलीस - १०८९
पोलीस अधिकारी - ७८
जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी - ९३१
डॉक्टर्स - १५०
प्रतिक्रिया
पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी योगा, ध्यानधारणा शिबिरे घेतली जातात. मात्र पोलीस ठाणे स्तरावर ही शिबिरे झाल्यास जास्त फायदा होईल. सध्या कोरोनामुळे काम वाढले असून कुटुंबीयांना वेळही देता येत नाही. त्यामुळे मानसिक थकवा जाणवत असल्याचे एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले.
कोरोनामुळे कामाचा व्याप वाढला आहे. यामुळे कुटुंबांना वेळ देता येत नाही. कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी दरबार भरविला जातो. तसेच योग शिबिरे, ध्यानशिबिरेही घेतली जातात. मात्र त्यात सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग क्वचित असतो, अशी माहिती एका पोलीस कर्मचाऱ्याने दिली.
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कामही वाढले आहे. यात कुटुंबाला वेळ देताना व आरोग्य सेवा देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नियमित योगा शिबिरे, मेडिटेशन शिबिरे घेतल्यास कर्मचाऱ्यांना फायदा होईल, असे मत एका आरोग्य कर्मचाऱ्याने व्यक्त केले.
कोरोनामुळे कुुटुंबाला वेळही देता येत नाही. जास्त वेळ दवाखान्यातच जात असल्याने मानसिक थकवा जाणवत आहे. मात्र रुग्णांना उपचार मिळणे महत्त्वाचे असल्याचे एका आरोग्य कर्मचाऱ्याने सांगितले.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी दरबार भरविला जातो. यातून त्यांच्या समस्याचे निराकरण केले जाते. तसेच योग शिबिर व तज्ज्ञांच्या मार्गदर्शन शिबिरांतून कर्मचाऱ्यांचा ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.
- यशवंत काळे, अप्पर पोलीस अधीक्षक, हिंगोली
आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना येणारा ताणतणाव कमी करण्यासाठी नियमित मेडिटेशन शिबिरे घेतली जातात. तसेच सोशल वर्करमार्फत कर्मचाऱ्यांचे समुपदेशन केले जाते. ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.
- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक