आजपासून स्वारातीम विद्यापीठाच्या पदवी परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:28 AM2021-03-08T04:28:32+5:302021-03-08T04:28:32+5:30
आखाडा बाळापूर : हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने जारी केलेल्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालये उघडण्यास परवानगी नसली तरीही ८ मार्चपासून सुरू होणाऱ्या ...
आखाडा बाळापूर : हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने जारी केलेल्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालये उघडण्यास परवानगी नसली तरीही ८ मार्चपासून सुरू होणाऱ्या विद्यापीठीय परीक्षा मात्र नियमित वेळापत्रकानुसारच होणार आहेत. कुलगुरूंनी हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा घेण्यास सहमती दर्शविली असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांनी कळविली आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए., बी.कॉम.,बी.एस्सी. या वर्गाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा ८ मार्चपासून सुरू होत आहेत. या परीक्षा १५ तारखेपर्यंत चालणार आहेत. दरम्यानच्या काळात हिंगोलीत जिल्हाधिकाऱ्यांनी १ ते ७ मार्चपर्यंत संचारबंदी लागू केली होती. ७ मार्च रोजी पुन्हा नवीन नियमावली जाहीर केली. त्यात शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेशित केले आहे. त्यामुळे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या परीक्षांचे काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. सर्व महाविद्यालये व परीक्षा केंद्रांवर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकाशी संवाद साधून याबाबतच्या अडचणी सांगितल्या होत्या. त्यानंतर सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याशी संवाद साधून नव्याने जारी केलेल्या नियमावली बाबत व परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत चर्चा केली. या चर्चेदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी नियमित महाविद्यालये व वर्ग सुरू करण्यास परवानगी नसल्याचे सांगितले. मात्र परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. याबाबतचा संदेश परीक्षा नियंत्रक डॉ. रवी सरोदे यांनी सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना कळविला असून, हिंगोली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये नियमित वेळापत्रकानुसारच परीक्षा आयोजित कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आज जारी केलेल्या नवीन आदेशामुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करून नियमित वेळापत्रकानुसार पदवीच्या परीक्षा पार पडणार आहेत. सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी परीक्षार्थींना याबाबत व्हॉट्सॲप संदेश करून परीक्षेच्या वेळापत्रकात कुठलाही बदल नसून नियमित वेळेत परीक्षा सुरू होईल, असे संदेश पाठवले आहेत.