हिंगोली: पेट्रोल व डिझेलबरोबरच आता गॅस सिलिंडरच्या दरातही २५ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे महिलांनी संताप व्यक्त केला असून ‘गॅस संपले तेल संपले, स्वयंपाक करु कशावर?’ असे म्हणण्याची वेळ महिलावर्गावर येवून ठेपली आहे.
सुदैवाची बाब म्हणजे गत दोन दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. खाद्यतेलाचे भावही वाढले आहेत. डिसेंबर महिन्यात गॅस सिलिंडर ६७०, जानेवारी महिन्यात ७२० भाव होते. ५ फेब्रुवारी रोजी ७४५, १५ फेब्रुवारी रोजी ७९५ आणि २५ फेब्रुवारी रोजी ८२० रुपये गॅस सिलिंडरचा दर झाला आहे. शहरातील बाजारपेठेत मागील काही दिवसांपासून तेलातही चढउतार सुरुच आहे. गत आठवड्यात सोयाबीन १३५, शेंगदाणा तेल १५५ प्रमाणे विकत घ्यावे लागत आहे. महागाईने कळस गाठला असून भाजीपाल्यासोबत किराणा बाजारातील वस्तूही महागल्या आहेत.
केंद्र सरकार सबसिडी सतत कमी असल्याने गॅस सिलिंडर महाग होत आहे. लोकांना घेणे आता परवडेना झाले नाहे. ग्रामीण भागात तर चक्कपणे चुलीवरच स्वयंपाक करणे अनेक गृहिणींनी पसंत केले आहे.
गॅस सिलिंडरचे दर कमी करण्याची महिलांची एकमुखी मागणी
महागाईने कळस गाठला असून, किराणा तसेच भाजीपाल्याचे भावही आता वाढू लागले आहेत. सरकार काय साध्य करु पाहत आहे, हेच कळायला मार्ग नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन दिवसांपासून स्थिर असले तरी खाद्य तेल कमी होण्याचे नाव घेत नाही. महागाईमुळे भाज्यांना फोडणीही कमी तेलातच द्यावी लागत आहे. तेव्हा प्र. के. अत्रे यांच्या ‘अति तिथे माती’ या नाटकातील संवादाप्रमाणे सर्वानी गाण्यांतून बोलावे, असे म्हणण्याची वेळ महिला वर्गावर आली आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया सुरेखा कल्याणनगर (यशवंतनगर), मनीषा देशमुख (सावरकरनगर), चतुराताई जगताप (लाला लजपतरायनगर), अर्चना मुळे (महावीरनगर), पूजा इंगोले (रामाकृष्णा सिटी), पुष्पा कावरे (श्रीनगर), विद्या लाखकर, शीतल दन्नर, वंदना अग्रवाल (कापड गल्ली) आदी महिलांनी दिली.