पाच दिवसांचा आठवडा तरीही दुपारीच दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:29 AM2021-07-31T04:29:57+5:302021-07-31T04:29:57+5:30
पूर्वी दुसऱ्या व तिसऱ्या शनिवारी सुटी नसायची. त्यामुळे या दिवशी दुपारीच अनेक कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसायचा. आता शासनाने पाच दिवसाच्या ...
पूर्वी दुसऱ्या व तिसऱ्या शनिवारी सुटी नसायची. त्यामुळे या दिवशी दुपारीच अनेक कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसायचा. आता शासनाने पाच दिवसाच्या आठवड्याची संकल्पना अमलात आणली आहे. त्यामुळे तरी कर्मचारी पाच दिवस अंग झटून काम करतील, अशी अपेक्षा होती. मात्र तसे होताना दिसत नाही. कर्मचारी शुक्रवारी सकाळी हजर तर होतात, मात्र दुपारपर्यंतही त्यांचा पाय कार्यालयात टिकत नसल्याचे चित्र आहे. काहीजण कशीतरी दुपारपर्यंत कळ सोसून दुपारून मात्र निमित्त सांगून गायब होताना दिसत होते. दुपारनंतर जि.प., जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी कार्यालय, तहसील, उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंचायत समिती या प्रमुख कार्यालयांतील उपस्थितीच ५० टक्क्यांच्याही खाली उतरल्याचे दिसत होते. इतर शासकीय कार्यालयांचा तर विचारच न केलेला बरा. काही ठराविक कार्यालयांमध्ये ठराविक कर्मचारीच जागेवर असल्याचे दिसून आले. तर काही कर्मचाऱ्यांना थांबण्याशिवाय तरणोपायच नसतो. त्यामुळे ते जागेवर असल्याचे दिसून येत होते. अन्यथा कंत्राटी कर्मचारीसुद्धा दुपारपासूनच गायब झाल्याचे चित्र पहायला मिळत होते.
काही दिवसांपूर्वी विविध कार्यालयात अधिकाऱ्यांनी तपासणीसत्र सुरू केले होते. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी सहापर्यंत थांबणे भाग पडत होते. आता अशी तपासणी बंद असल्याने अनेकांचे फावत आहे.