हिंगोली: उन्हाची तीव्रता लक्षात घेता पक्ष्यांसाठी पाणी मिळणे कठीण आहे. यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी नगरपालिका कर्मचारी व इतर कामगारांना साेबत घेत टाकावू प्लास्टिकचा सद्उपयोग कसा करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर दोनशे पाणवठे तयार केले असून मागील आठ दिवसांपासून हा उपक्रम सुरु आहे.
फेब्रुवारीत उन्हाची तीव्रता वाढली आहे. यामुळे पक्ष्यांना पाणी मिळत नसून, भटकंती करीत आहेत. कधी रस्त्याच्या कडेला लावलेल्या झाडांवर बसतात, पण पाणी मिळत नाही. पक्ष्यांची केविलवाणी अवस्था पाहून कचऱ्यातील टाकावू प्लास्टिकचा सदुपयाेग करून पक्ष्यांसाठी पाणवठे तयार केले आहेत. आठ दिवसांपासून तयार केलेले पाणवठे लावण्याचे काम सुरू आहे. शहरातील रामलीला मैदान, पोलीस कवायत मैदानच्या कडेला असलेल्या दीडशे ते दोनशे झाडांवर आजपर्यत पाणवठे (चंचूपात्र) तयार करून बांधले आहेत. याबराेबर पक्ष्यांसाठी अन्नाची व्यवस्थाही करण्यात केली आहे. झाडाच्या एका फांदीवर पाण्याची सुविधा तर दुसऱ्या फांदीवर तांदूळ, डाळ व इतर खाद्यपदार्थ एका चंचूपात्रात ठेवले जात आहेत. यासाठी काही ठरावीक कर्मचारीही नेमले आहेत. पाणवठे तयार करून शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना बांधण्यासाठी रुपेश क्यातमवार, चंदू लव्हाळे, संतोष ठके, ज्ञानेश्वर कऱ्हाळे, बाबाराव बुजवणे हे सहकार्य करत आहेत.
दोन हजार पाणवठे तयार करण्याचा मानस
कचऱ्यामध्ये टाकावू प्लास्टिक मोठ्या प्रमाणात सापडते. हे प्लास्टिक काही दिवसांनंतर कुजून जाते. कचऱ्यातील प्लास्टिक उपयोगात कसे आणता येईल, याचा विचार आधी केला. यासाठी काही ठरावीक कर्मचाऱ्यांना पाणवठे तयार करण्याची संकल्पना सांगितली. सद्य:स्थितीत दीडशे ते दोनशे पाणवठे तयार केले असून झाडांना बांधलेही आहेत. येत्या काही दिवसांत एक ते दोन हजार पाणवठे तयार केले जाणार असून त्यात पाणी व अन्नाची व्यवस्थाही केली जाणार आहे.
- डॉ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी, न. प. हिंगोली
फाेटाे नं. ०५