हिंगोली : जिल्हा परिषदेच्या दलित वस्ती सुधार योजनेचे नियोजन आता अंतिम टप्प्यात आले असून, मार्च एंडपर्यंत यातील सर्व कामांना मंजुरी मिळेल, असा विश्वास समाजकल्याण सभापती फकिरा मुंढे यांनी व्यक्त केला. दलित वस्ती सुधार योजनेसाठी यावर्षी १९ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या योजनेच्या नियोजनाला कोरोनामुळे ग्रहण लागले हाेते. ३० टक्क्यांप्रमाणेच निधी मिळणार असल्याच्या शासन निर्णयामुळे यातून किती व कसे नियोजन करायचे, यातच सदस्य व समिती हैराण झाली होती. त्यानंतर पूर्ण निधी देण्याचे शासनाने जाहीर केले तर दलित वस्ती सुधार योजनेच्या आराखड्याचा प्रश्न पुढे आला होता. तोही प्रश्न सोडविण्यासाठी बराचकाळ वाया गेला. त्यानंतर आता मार्च महिन्यात नियोजनासाठी ठराव घेऊन प्रत्यक्ष कामांच्या शिफारसी करण्यासाठी सदस्यांची धावपळ सुरू झाली होती. मार्च एंड जवळ आल्याने याकडे पुन्हा काहीसे दुर्लक्ष झाले होते. मात्र, आता हे नियोजनही अंतिम टप्प्यात आले आहे. आता ठरलेल्या नियोजनाप्रमाणे सदस्य, पदाधिकारी आदी आपापल्या भागातील कामे सुचवत असून, तसे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केले जात आहेत. या प्रस्तावांची छाननी आता सुरू झाली आहे. एक ते दोन दिवसात या प्रस्तावांची छाननी पूर्ण करून मार्च एंडच्या आत निधी वितरणाचे आदेश काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढील मार्च एंडपर्यंत हा निधी खर्च करण्याची मुभा असली, तरीही कामांना मंजुरी दिल्यानंतर ती कामे पुढील वर्षभरात पूर्ण होण्यासाठी तसेच बहुतांश कामे या उन्हाळ्यातच पूर्ण करण्यासाठी आता कामे मंजुरीची लगबग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
दलित वस्ती सुधारचे नियोजन अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:28 IST