मागील आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचे पाहून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी २० फेब्रुवारीपासून नगर परिषद व पोलीस प्रशासनाला सूचना केली असून मास्क न घालणाऱ्यांना दंड लावण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, २२ फेब्रुवारी रोजी शहरातील खासगी डाॅक्टर व शासकीय डाॅक्टरांची बैठक घेऊन नागरिकांची काळजी घेण्याच्या मौलिक सूचनाही दिल्या आहेत.
जिल्ह्यात १८ फेब्रुवारी रोजी १३ रुग्ण, १९ फेब्रुवारी रोजी १६ रुग्ण, २० फेब्रुवारी रोजी २० रुग्ण, २१ फेब्रुवारी रोजी १६ रुग्ण आणि २२ फेब्रुवारी रोजी ९ रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात ३ हजार ९१६ रुग्ण झाले असून ३ हजार ७५२ रुग्ण बरे झाले आहेत. १०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५८ व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.