वरीष्ठ लोकप्रतिनिधींनीच खेचला निधी
जिल्हा वार्षिक योजनेत पुनर्विनियोजनात जिल्ह्यात वरिष्ठ लोकप्रतिनिधींनीच आपल्या कामांना प्राधान्य देत निधी खर्ची घातल्याचा आराेप जि.प.सदस्य व नगरसेवकांतून होत आहे. यामध्ये काँग्रेसने मात्र आपल्या जि.प.सदस्य, नगरसेवक, पक्ष पदाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या कामांना प्राधान्य दिले. शिवसेना व राष्ट्रवादीत मात्र तसे न घडल्याने यावरून ओरड होत असल्याचे दिसून येत होते. यात आमदार व खासदारांनीच आपल्या कामांना प्राधान्य दिल्याची ही ओरड आहे. यासाठी अनेक कार्यकर्ते मात्र शेवटपर्यंत निधी मिळावा, यासाठी लढा देताना दिसत होते.
पंचायत समित्यांत होतेय खांदेपालट
सध्या शिवसेना, काँग्रेसने एकापेक्षा जास्त जणांना संधी मिळावी म्हणून पंचायत समितीत खांदेपालटाची टूम काढली आहे. हिंगोली पंचायत समितीत काँग्रेसच्या उपसभापतीने राजीनामा दिल्यानंतर आता सेनेच्या सभापतींनीही राजीनामा दिला आहे. या दोन्ही पक्षांनी एकत्र येत येथे सत्ता स्थापन केली होती. आता हे दोन्ही पक्ष नवे पदाधिकारी देणार आहेत. त्याचबरोबर सेनगावातही शिवसेनेने सभापती पदाचा राजीनामा दिला. आता येथे काँग्रेसचा सभापती होणार? असल्याचे सांगितले जात आहे. निवडणुका वर्षभरावर आल्या असताना होत असलेल्या या बदलांतून काय साध्य होणार? हा प्रश्नच आहे.