हिंगोली : गत चार दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे बसस्थानकातील खड्ड्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. संततधार पावसामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली असून उद्घाटनाआधीच नवीन बसस्थानकाचा आसरा घेतला आहे.
दहा दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात ४ सप्टेंबरपासून संततधार पाऊस पडत आहे. नवीन बसस्थानकाचे काम सुरू असल्यामुळे पत्राच्या शेडमध्ये काही महिन्यांपासून प्रवाशांसाठी बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. उन्हाळ्याचे कसेबसे दिवस प्रवाशांनी तसेच काढले; परंतु सद्य:स्थितीत पावसात बसणे कठीण झाले आहे. नवीन बसस्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असतानाच प्रवाशांना पावसाळ्यात चिखलांचा सामना करावा लागत आहे. चिखलातून धावत जाऊन बस पकडावी लागत आहे.
... ही तर तारेवरची कसरत
पावसाळ्याचे दोन महिने काही वाटले नाही. कोरड्या खड्डयातून बस बाहेर काढली. त्यादरम्यान थोडाबहुतच पाऊस झाला होता. त्यामुळे बसस्थानकातील खड्ड्यांमध्ये पाणी साचले नाही; परंतु आता चार दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे बसस्थानकातील खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे बसस्थानकातून बस बाहेर काढतेवेळेस ‘तारेवरची कसरत’ करावी लागत आहे, अशी प्रतिक्रिया चालकांनी दिली.
फोटो आहे