तंत्र शिक्षण संचालनालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी पॉलिटेक्नीकच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या पदविका अभ्यासक्रमासाठी ३० जूनपासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे प्रवेश अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. जिल्ह्यात एकमेव शासकीय तंत्रनिकेतन (२४०) व एक खाजगी (१८०) अशा दोन कॉलेजमधील ४२० एवएी प्रवेश क्षमता आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ७०० विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निकच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. यातील जवळपास २०० विद्यार्थ्यानी नोंदणी अर्ज कन्फर्म केले आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांना १०वी/१२वी मार्कशिट, राष्ट्रीयता प्रमाणपत्र, टी.सी., जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेयर आदी प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी कागपत्रे प्राप्त होण्यास अडचण येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावेत, यासाठी येथील शासकीय तंत्रनिकेतनकडून सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना एका पत्राद्वारे विनंती केली आहे. तसेच टी.सी. उपलब्ध करून देण्यासंदर्भात शिक्षणाधिकारी पावसे यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापकांसोबत ऑनलाईन कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधला आहे. विद्यार्थ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय यांनी केले.
६ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार
पॉलिटेक्निकच्या प्रवेशासाठी ३१ जुलै पर्यंत मुदत होती. मात्र विविध कागदपत्रे उपलब्ध होण्यास वेळ लागत असल्याने प्रवेशासाठीच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय तंत्र शिक्षण संचालनलयाने घेतला. त्यानुसार प्रथम वर्ष पॉलिटेक्निक प्रवेशासाठी ६ ऑगस्टपर्यंत मुदत वाढविण्यात आल्याची माहिती प्रा.डॉ. जावेद शेख यांनी दिली.