हिंगोली : जिल्ह्यातील घटत्या रुग्णसंख्येसोबतच कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे प्रमाणही घटत आहे. त्यामुळे जिल्ह्यात शासकीय व खासगी रुग्णालयांत जवळपास १०० बेड रिकामे झाले आहेत. मागील काही दिवसांपासून ही संख्या वाढतीच आहे. जिल्ह्यातील सहा शासकीय संस्थांमध्ये ५४० बेडची व्यवस्था आहे. यापैकी ३६२ जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात ५, नवीन कोविड सेंटरमध्ये १२, कळमनुरीत २३, वसमतला १२, सिद्धेश्वर येथे ५ असे एकूण ५७ ऑक्सिजन बेड रिकामे आहेत.
जिल्ह्यात खासगी १२ रुग्णालयांची बेडची संख्या २८२ एवढी आहे. याठिकाणी ९१ रुग्ण हे ऑक्सिजनविना आहेत तर १२३ जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. हिंगोलीत ६ तर वसमतला ३२ असे खासगी रुग्णालयांत ३८ ऑक्सिजन बेड रिकामे आहेत.
आठ दिवसांपूर्वी बेड मिळत नसल्याने सुरू असलेली मारामार लक्षात घेत अनेक ठिकाणी नवीन ऑक्सिजन बेडसाठी तयारी सुरू केली होती. काही ठिकाणचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. वसमत येथील आयटीआयमध्ये १२० बेडची व्यवस्था झाली आहे. मात्र, त्यापूर्वीच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आलेख उतरत असल्याने जिल्हावासीयांना ही दिलासा देणारी बाब आहे. खासगी रुग्णालयांतही जवळपास १२०पेक्षा जास्त ऑक्सिजन बेडवर रुग्ण असल्याने शासकीय यंत्रणेवरील ताणही हलका झाला. मात्र, अजूनही कोरोनाचा धोका टळला नसून, संचारबंदीच्या निर्बंधात सूट मिळाल्याच्या दिवशी गर्दी न करता, बाजारपेठ व इतरत्र वावरण्याचे आवाहन करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्व नियम पाळल्यास रुग्णसंख्या अशीच आटोक्यात राहू शकते. त्यामुळे नागरिकांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.