लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा केशोरी ते वडेगाव (बंध्या), केशोरी ते महागाव ही दोन्ही जिल्हा मार्ग अत्यंत खराब झाला आहे. केशोरी येथील तीन वर्षांपासून मंजूर असलेला बायपास रस्ता प्रशासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे प्रलंबित पडला आहे. त्यामुळे जड वाहने गावातून जात आहेत. या प्रकारामुळे येथील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा लागण्यापूर्वी केशोरी ते वडेगाव (बंध्या) आणि केशोरी ते महागाव या दोन्ही रस्त्यांसह केशोरी बायपास रस्त्याची कामे सुरू करावी, अन्यथा शिवसेना शाखा केशोरीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चेतन दहीकर यांनी दिला आहे. केशोरी ते वडेगाव (बंध्या) आणि केशोरी ते महागाव या दोन्ही जिल्हा मार्गाचे डांबरीकरण उखडून मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्या कंत्राटदाराने डांबरीकरण केले, त्या कंत्राटदाराची देखभाल करण्याची जबाबदारी पुढील पाच वर्षांपर्यंत स्वीकारली आहे. परंतु त्या कंत्राटदाराचे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष नाही. त्यामुळे सदर रस्त्याची दुरवस्था अनेक महिन्यांपासून कायम आहे. संबंधित कंत्राटदार, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या रस्ता दुरुस्तीसाठी एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहेत काय? असा संतप्त सवाल शिवसेना शाखा केशोरीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. दोन्ही रस्त्यांना पडलेली खड्डे चुकविताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी तर या मार्गाने प्रवास करणे अधिकच जीवघेणे ठरू पाहात आहे. मात्र, या रस्ता दुरुस्तीकडे सातत्याने अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.
अपघातांच्या संख्येत वाढ
- या रस्त्याच्या प्रवासादरम्यान लहान-मोठी अपघात घडून अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, अजूनही प्रशासनाला जाग आली नाही. केशोरी बायपास रस्ता मंजुरीला तीन वर्षे लोटूनही रस्ता निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे सर्व वाहने गावाच्या अरुंद असलेल्या रस्त्याने मध्य भागातून जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. या रस्त्याने रात्रंदिवस वाहने धावत असल्यामुळे येथील नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. शिवसेना आंदोलनाच्या पवित्र्यात- केशोरी ते वडेगाव (बंध्या), केशोरी ते महागाव या दोन्ही रस्त्यांबरोबर केशोरी बायपास रस्ता निर्मितीची कामे करावी, अन्यथा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित कंत्राटदाराच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना शाखा केशोरीच्या वतीने माजी शिवसेना तालुका प्रमुख चेतन दहीकर यांनी दिला आहे.