लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोकणाई कवठा मार्गावर ट्रॅक्टर उलटून एका महिलेचा मृत्यू तर पाच जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१६) सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. सत्यभामा मनिराम कुंभरे (५५) रा. नवेगावबांध असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर जखमींवर नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. प्राप्त माहितीनुसार नवेगावबांध येथून मजूर घेऊन हा ट्रॅक्टर क्र. एमएच ३५, ८१०५ ट्राली क्र. एमएच ३५ डी ८१४० गोठणगावच्या वामन चांदेवार यांचे शेतात रोवणीसाठी जात होता. त्यात ७ महिला व दोन पुरुष मजूर होते. सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास कवठा जंगल परिसरात समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला साईड देत असताना तोल जाऊन ट्रॅक्टरची ट्राली उलटली. यात सत्यभामा मनिराम कुंभरे या महिलेचा जागीच मृत्यू झाला. मृतकाची सून गायत्री अशोक कुंभरे (२८) हिचा या अपघातात पाय तुटला. तर देवांगणा वामन चांदेवार (५०), संगीता मुकेश चाफेकर (४०), विमल सितकुरा बडोले (६०),पंचफुला युवराज साखरे (६५) या सुध्दा जखमी झाल्या. दरम्यान घटनास्थळावर उपस्थित नागरिकांनी जखमींना नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमींवर उपचार सुरु आहे. तहसीलदार विनोद मेश्राम यांनी नवेगावबांधच्या ग्रामीण रुग्णालयात जखमींची विचारपूस केली. रोवणीची कामे सुरु असल्याने मजुरांना शेतापर्यंत पोहचविण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो.