माहिती देणाऱ्यास बक्षीस : सहा महिन्यानंतरही सुगावा नाहीगोंदिया : गोरेगाव तालुक्यातील जंगल परिसरात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन महिलांचा खून करून त्यांचा मृतदेह जंगलात टाकण्याच्या घटना गेल्या ८ जुलै २०१५ व १४ आॅक्टोबर २०१५ रोजी उघडकीस आल्या होत्या. परंतू गेल्या त्या दोन्ही महिलांची ओळख पटविण्यात गोरेगाव पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे या प्रकरणांचा तपास खोळंबला आहे. गोरेगाव पोलिसांबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस त्या महिलांची ओळख पटविण्यासाठी नाना प्रकारच्या युक्त्या लढवित आहेत. आता त्यासाठी बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तिल्ली-मोहगावच्या जंगल परिसरात ८ जुलै रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास २० ते ३० वर्षाच्या वयोगटातील महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला. तिच्यावर अतिप्रसंगही झाला आहे. पाच फूट उंचीची, रंग गोरा, हातात चांदीची अंगठी, गळ्यात मंगळसूत्र परिधान केलेल्या महिलेची ओळख आतापर्यंत पटली नाही. तिची ओळख पटल्यानंतर आरोपीपर्यंत जाणे पोलिसांना सोयीस्कर होणार आहे.दुसरी घटना सुर्यादेव मांडोदेवी जंगल परिसरातील आहे. २० ते ३० वर्षाच्या महिलेचा खून करून तिचा मृतदेह तलावातील पाण्यात टाकण्यात आला होता. ही घटना १४ आॅक्टोबर रोजी उघडकीस आली. तिच्यावरही बळजबरी झाली असावी. त्या महिलेची उंची पाच फूट, रंग गोरा, मजबूत बांधा आहे. परंतु याही महिलेची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे या घटनेतील आरोपीपर्यंत पोलिसाना पोहचता आले नाही. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसही या दोन्हीे घटनातील मृत महिलांची ओळख पटविण्याच्या कामाला लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)माहिती देणाऱ्यास पुरस्कारगोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत घडलेल्या या दोन महिलांच्या खुनातील आरोपींना पकडता यावे यासाठी मृत महिलांची ओळख करणे आवश्यक आहे. या घटनेतील महिला आपल्या जिल्ह्यातील नसल्या तरी आरोपी जिल्ह्यातीलच असावा, कारण जंगलात एवढ्या आत जाणे बाहेरच्या व्यक्तीसाठी अशक्य आहे. त्यामुळे आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी सुगावा लागावा म्हणून गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांनी या घटनेची माहिती देणाऱ्यांना बक्षीस देण्याचे ठरविले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही रणवरे यांनी सांगितले.
खून झालेल्या ‘त्या’ दोन महिला कोण?
By admin | Updated: February 2, 2016 01:37 IST