नामदेव हटवार - जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी व त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी ‘गावची शाळा - आमची शाळा’ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शिक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी व गावात शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी सहभागी सर्व घटकांचा सक्रीय सहभाग कसा घेता येईल हे प्रकल्पाच्या उद्दिष्टात नमूद करण्यात आले आहे.सत्र २०१२-१३-१४ या काळात उपक्रम राबविताना प्रभागस्तरीय, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय समित्यांनी शाळांचे मूल्यमापन करुन प्रथम व द्वितीय क्रमांक ठरविले. त्यात काही शाळांची प्रगती ही समाधानकारक आढळली तर काही शाळांनी या उपक्रमात नाममात्र, औपचारिकता म्हणून भाग घेतला. या उपक्रमाच्या माध्यमातून जनप्रतिनिधींनी व पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळेला भेट देऊन पाहणी केली. त्यात त्यांना शाळेची वस्तुस्थिती काय आहे हे प्रत्यक्षात दिसून आले.हा उपक्रम दोन वर्षापासून सुरू असताना या दोन वर्षात या उपक्रमामुळे सकारात्मक काय बदल झाला याचे परिक्षण कोण करणार? कधी करणार? असा प्रश्न निर्माण होतो. जर या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढत असेल तर ती सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांची वाढते काय? की फक्त पुरस्कार प्राप्त शाळेतीलच विद्यार्थ्यांची वाढते याचे परिक्षण होणे आवश्यक आहे. कोणतीही योजना राबविताना गुणात्मक बदल बघणे आवश्यक आहे. जर योजना राबविताना त्यात गुणात्मक व सकारात्मक बदल होत नसेल तर अशा उपक्रमाला बंद करणे योग्य असते.त्यामुळे वेळ, पैसा व श्रय याची बचत होते. तेव्हा ‘गावची शाळा-आमची शाळा’ या उपक्रमाचे परीक्षण होणे आवश्यक आहे. या परिक्षणातून काही त्रुट्या आढळल्या तर त्या कशा दूर करता येईल, कामचोर शिक्षकांना या प्रकल्पात कसे कामाला लावता येईल याचाही विचार करणे आवश्यक आहे.सालेकसा तालुक्यातील ११८ शाळांचे दोन वर्षात मूल्यमापन झाले. त्यात काही शाळांनी शिक्षक, पालकांच्या सहकार्याने उत्तम काम करून पुरस्कार मिळविले. परंतु काही शाळांची काहीच प्रगती झालेली नाही. या शाळांचा विकास कसा होणार याचा विचार कोण करणार असा प्रश्न निर्माण होतो. जर शिक्षकांच्या अपडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असेल तर त्या शिक्षकांवर कारवाई झालीच पाहिेजे. काही ठिकाणी कठोरपणे नियमाची अंमल बजावणी केलीच पाहिजे. असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यावर उपाययोजना कठोरपणे शिक्षण विभागाने केली पाहिजे. नाही तर तेथेही भाई भतिजावाद, जातीवाद, राजकीय संबंध आणण्यात येते. तेव्हा ‘गावची शाळा- आमची शाळा’ या उपक्रमाचे परीक्षण करणे आवश्यक आहे. या परीक्षणास तज्ज्ञ, विद्वान, शिक्षण क्षेत्राशी निगडित व्यक्तींचा समावेश असायला पाहिजे. तरच या उपक्रमाचे फलित दिसून येईल.
गावची शाळा-आमची शाळा या प्रकल्पाचे परीक्षण कोण करणार?
By admin | Updated: July 5, 2014 23:41 IST