गोंदिया : भंडारा येथे रमजान ईदच्या दिवशी शितलामाता मंदिरात घडलेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध व्यक्त करीत येथील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्यावतीने ३० जुलै रोजी निवासी उप जिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांना निवेदन देण्यात आले. तसेच मंदिरांवर होत असलेले हल्ले बर्दाश्त न करता या विरोधात आंदोलन केले जाणार असल्याचा ईशारा देत दोषींना अटक करून कठोर कारवाईची मागणी निवेदनातून करण्यात आली. रमजान ईदच्या दिवशी २९ जुलै रोजी भंडारा येथे एका जागेच्या वादातून दोन गटांत जुंपली होती. यामध्ये एका गटाने शितला माता मंदिरावर दगड फेक केली होती. यामुळे भंडारात वातावरण चांगलेच तापले होते व भंडारा बंद करण्यात आले होते. हिंदूंच्या मंदिरावर करण्यात आलेल्या दगडफेकीच्या या घटनेचा तिव्र निषेध विश्व हिंदू परिषद व बजरंग दलने नोंदविला. तसेच या घटनेच्या निषेधार्थ ३० जुलै रोजी निवासी उप जिल्हाधिकारी वालस्कर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातून विहीप व बजरंग दलने हिंदूंच्या मंदिरांवर झालेल्या दगडफेक सारखे कृत्य पुढे खपवून घेतले जाणार नसल्याचे नमूद केले आहे. एवढेच नव्हे तर जिल्हा प्रशासनाने या विषयाला गांभीर्याने घेत दोषींना त्वरीत अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच वेळ पडल्यास विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तिव्र आंदोलन करणार असा ईशारा निवेदनातून दिला आहे. याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष भिकम शर्मा, जिल्हा महामंत्री मनोज मेंढे, सहमंत्री सुधीर ब्राम्हणकर, महेंद्र देशमुख व अन्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
भंडाराप्रकरणी विहिंपचे निवेदन
By admin | Updated: August 1, 2014 00:22 IST