लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरात भू-माफिया व गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून सामान्य नागरिकांची मुस्कटदाबी केली जात आहे. या अत्याचाराला रोखण्यात यावे अशी मागणी येथील विविध सामाजिक संघटनांनी केली असून जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. निवेदनात, नगर परिषद व लगतच्या ग्रामीण परिसरात काही वर्षांपासून ज़मीन व प्लाॅटच्या धंद्यात लिप्त काही लोकं चुकीच्या पद्धतीने प्लॉटवर कब्जा करणे तसेच एकच प्लॉट अनेक लोकांना विकून सामान्य जनतेची फसवणूक करीत आहेत. असे प्रकार कित्येकदा उद्भवले असून अनेक पोलीस केसेस सुद्धा झाल्या आहेत. परंतु सर्वसामान्य जनतेशी निगडित अशा प्रकरणात शासकीय यंत्रणा पाहिजे तशी लक्ष देऊन कार्यवाही करीत नाही, किंवा अपराधिक गतिविधीत लिप्त भू-माफियांना आश्रय प्राप्त होताना दिसतो. अशाच जमीन खरेदी विक्री व्यवसायात जीव घेण्यासाठी लोक मागेपुढे बघत नाही. २८ जानेवारी रोजी धनेंद्र भुरले या सामाजिक कार्यकर्त्यावर गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी गोळीबार करुन त्यांना ठार करण्याचा प्रयत्न केला व या प्रकरणातून याची प्रचिती येते. अशा व या सारख्या प्रकरणात विशेष लक्ष देऊन आरोपींवर कार्यवाही करण्यात यावी, जेणेकरून जनता भयमुक्त जीवन जगू शकेल असे नमूद आहे. निवेदन देताना विविध सामाजिक संघटनांकडून डी.एस. मेश्राम, कैलास भेलावे, रमेश ब्राम्हणकर, सुनील भोंगाडे, लीलाधर पाथोडे, रमेश नामपल्लीवार, विठ्ठल भरणे, अतुल सतदेवे, मालती किन्नाके, हेमलता आहाके यांच्यासह अन्य उपस्थित होते.
अन्यथा तीव्र आंदोलन करणार - शहरात वाढत असलेले गोळीबार प्रकरण गंभीर होत चालले आहे. गुंड लोक अवैधरित्या शस्त्र बाळगतात. अशात त्यांच्यावर मोका अंतर्गत सक्त कार्यवाही करण्यात यावी. भुरले गोळीबार प्रकरण व अशा अन्य गंभीर प्रकरणात लिप्त गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांची योग्य चौकशी करून सामान्य जनतेला न्याय देण्याची मागणीही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, भुरले गोळीबार प्रकरण व यासारख्या प्रकरणात प्रशासनातर्फे कोणत्याही प्रकारची दिरंगाई केल्यास किंवा तपासात कमतरता आढळून आल्यास सर्वसामान्य जनतेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारासुद्धा सामाजिक संघटनांकडून देण्यात आला आहे.