सडक/अर्जुनी : वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या जांभळी व शेंडा वनक्षेत्रातील सागवन झाडांची सर्रासपणे कत्तल होत असल्याचे चित्र उभे आहे. मागील अनेक दिवसापासून सागवनाची कत्तल करून चिराणची तस्करी होत असल्याची माहिती आहे. मात्र वनविभागाचे याकडे दुर्लक्ष आहे.मागील अनेक दिवसापासून जांभळी व शेंडा परिसरात सागवनाच्या झाडांची कत्तल केली जात आहे. गावठी आऱ्याच्या माध्यमातून कत्तल केलेल्या सागवन झाडाला चिरून त्या पाट्या फर्निचरचे काम करणाऱ्या लोकांना विक्री होत अल्याची माहिती आहे. ही प्रकार रात्रीच्या वेळी होत असल्याची माहिती आहे. परंतु वनविभागाचे कर्मचारी रात्रीच्यावेळी गस्त घालत नसल्यामुळे सागवण तस्करांचे चांगलेच फावले आहे. या परिसरात दररोज सागवनाची होणारी कत्तल आपल्याला भोवणार असल्याचे लक्षात घेऊन वनविभागाने थातूर मातूर करावाई केली आहे. या प्रकारात तीन छोटे मासे अडकले. मात्र मोठे मासे अजूनही फरार असल्याची विश्वसनिय माहिती आहे. सागवन क्रमांक एक चे झाड असल्यामुळे याकडे शासनाची व तस्करांचीही नजर राहते. या वनातील लाकडे चोरणाऱ्या तस्करांशी वनविभागाच्या काही कर्मचारी, अधिकारी यांचे सोटेलोटे असवोत असे बोलल्या जात आहे. वनविभागाच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे लक्ष घालून सागवन वृक्षांची होणारी कत्तल थांबविण्याची मागणी होत आहे. तस्करांनी लाखो रूपयाचा माल चोरून नेला आहे. या परिसरात घनदाट जंगल असल्याने त्याचा फायदा घेत वनमाफीयांकडून रात्रीच्या वेळी या सागवनाची तस्करी करण्यात येते. ते माफीये लाकडे वाहनातून वाहून नेत असल्याची माहिती मिळाल्यावरही वनकर्मचारी कारवाई करीत नाही. त्या माफियांना संरक्षण देण्याचे काम वन कर्मचारी करीत आहेत. जंगलातील सागवनाची झाडे मोठ्या प्रमाणात जात असल्यामुळे ते प्रकरण आपल्या अंगावर येऊ नये म्हणून त्यांनी थातूर-मातूर तर कारवाई केली नाही ना अशी शंका अनेकांना येत आहे.सागवनाच्या चिरानची मागणी अधिक असल्यामुळे याच झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत आहे. वनाधिकाऱ्यांची रात्रगस्त बंद असल्यामुळे सागवनाची झाडे कापण्यात येत आहेत.या प्रकरणाची चौकशी झाल्यास वनरक्षक व वनमजूर अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही गावातील जंगलात चोरीला गेलेल्या झाडांची शोध मोहीम राबविण्याची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)
जांभळी परिसरात सागवनाची कत्तल
By admin | Updated: December 3, 2014 22:53 IST