गोंदिया : जिल्ह्यात यावर्षी वाळू माफियांना अवैधपणे रेतीचा उपसा करणे चांगलेच महागात पडत आहे. अनेक गब्बर माफियांवर महसूल विभागाने बेधडक कारवाई करून कोट्यवधी रुपयांचा दंड आकारला आहे. कधी नव्हे अशी कारवाई यावर्षी पहिल्यांदाच होत असल्याने वाळू माफिया चांगलेच जेरीस आले आहेत. मात्र यामुळे शासनाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होत आहे.जिल्ह्यात यावर्षी ३१ रेतीघाटांचा लिलाव झाला. त्याद्वारे शासनाला ५ कोटी २ लाख रुपयांचा महसूल मिळाला. मात्र त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त रुपयांचा दंड रेती उपसा करणाऱ्या माफियांना आकारण्यात आला आहे.खनिकर्म विभागाच्या उपसंचालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत काही घाटांची तपासणी केली. त्यात काही कंत्राटदारांनी लिलावात जितके क्षेत्र रेती उपशाकरिता मंजूर होते त्यापेक्षा कितीतरी जास्त रेतीचा उपसा केल्याचे दिसून आले. त्यामुळे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी मोहम्मद असमल मजित गोंडिल या लिलावधारकाला अर्जुनी (ता.तिरोडा) येथील घाटासाठी ८८ लाख ६१ हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच घाटकुरोडा-२ या घाटासाठी ५ कोटी ५३ लाख ९६ हजार ५३८ रुपये, सरफराज अमित गोंडील यांना महालगाव (ता.गोंदिया) येथील घाटासाठी ३ कोटी ३८ लाख ३० हजार ७२३ रुपयांचा तर मंगलमूर्ती ट्रेडर्स यांना घाटकुरोडा-२ या घाटासाठी ३ कोटी ६६ लाख १३ हजार १०३ रुपयांचा दंड ठोठावला. हा दंड अद्याप त्यांनी भरला नसल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी बोमीडवार यांनी सांगितले.(जिल्हा प्रतिनिधी)तिरोड्यात ५० लाखांचा महसूल तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे यांनी रेती माफियांविरूद्ध उघडलेल्या मोहिमेत अवैधपणे रेतीचा उपसा करून त्याचा साठा करणाऱ्यांची रेती जप्त केली. त्या रेतीचा लिलाव करण्याची कारवाई सुरू आहे. कवलेवाडा घाटावरून जप्त ५०० ब्रास रेती ४ लाख ५१,५०० रुपयांत लिलावात गेली. घाटकुरोडा क्र.२ मधून जप्त १५०० ब्रास रेती १३ लाख ५० हजारात लिलावात गेली. याशिवाय अर्जुनी घाटावरून १०० ब्रास, बिरसी मलपुरी घाटावरील ४० ब्रास तर बोंडरानी घाटावरून जप्त ३०० ब्रास रेतीचा लिलाव होणे बाकी आहे. या सर्व रकमेतून ५० लाखांचा महसूल विभागाला मिळणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे जप्त केलेल्या रेतीमधून जवळपास १००० ब्रास रेती चोरीला गेली. ती चोरीही एसडिओ महिरे यांनी पकडून ट्रक व जेसीबी जप्त केले.
जिल्ह्यातील वाळू माफियांविरुद्ध महसूल विभाग आक्रमक
By admin | Updated: September 23, 2015 05:30 IST