काचेवानी : शेतकऱ्यांना सहकार्य आणि मार्गदर्शनाकरिता शासनाचा कृषी विभाग कार्यरत आहे. शेतकऱ्यांना योग्यवेळी औषधाचा पुरवठा होणे आवश्यक असते. मात्र यावर्षी कीटकनाशक आणि बुरशीनाशक औषधाचा पुरवठा कृषी विभागाने न केल्याने शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. ढगाळ वातावरणामुळे लष्करी अळी आणि मावा-तुडतुडा पसरण्याची भीती आहे. आतापर्यंत करपा आणि खोडकिडा धानपिकावर दिसत होता. परंतु शेतकऱ्यांनी प्रयत्न करून या रोगाचे प्रमाण कमी केले. यावेळी लष्करी अळी व मावा-तुडतुडा काही प्रमाणात दिसून येत आहे. त्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून कृषी विभागाकडून अद्याप औषधाचा पुरवठा करण्यात आला नाही. कृषी विभागाकडून कमी दरात औषधी मिळणार अशी यावर्षीही शेतकऱ्यांना आशा होती. मात्र आतापर्यंत औषध पुरविण्यात आली नाही. शेतकऱ्यांची यावेळी आर्थिक परिस्थिती खालावली असल्याने बाजारातून औषधाची खरेदी कशी करावी? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. सप्टेंबर महिन्याचा दुसऱ्या आठवड्यापासून हलक्या धानाच्या लोंबा निघणे सुरू झाल्या आहेत. यावेळी मावा-तुडतुडा आणि लष्करी अळीचा प्रकोप असतो. त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ढगाळ वातावरण आणि दिवसा येणाऱ्या पावसाच्या सरी फुलाव्यावर असणाऱ्या धान्याला नुकसानकारक ठरू शकतात. नैसर्गिक बदलामुळे यावर्षी पाहिजे तसे धानपीक उठल्याचे दिसून येत नाही. गेल्या १५ ते २० दिवसात धानाची वाढ हवी तशी झालेली नाही. तिरोडा कृषी विभागाने औषधाची मागणी केली. मात्र अद्याप शेतकऱ्यांना औषधाचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे आधीच आर्थिक तंगी सहन करीत असलेल्या शेतकऱ्यांना पुरेसे पीक होईल किंवा नाही, ही चिंता सतावत आहे. शेतकरी वर्गाला शासन किंवा संबंधित विभागाने मोकळ्या मनाने कोणत्याही सुविधा, योजना किंवा मदत दिलेली नाही, असाही आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (वार्ताहर)
औषधीचा पुरवठा वेळीच न झाल्याने शेतकऱ्यांत नाराजी
By admin | Updated: September 18, 2014 23:37 IST