खरीप हंगाम : जिल्हा बँकेसह व्यावसायिक बँका व ग्रामीण बँक देणार कृषी कर्ज गोंदिया : येत्या १ जूनपासून सुरू होत असलेल्या खरीप हंगामासाठी शेतकर्यांची तयारी जोरात सुरू आहे. बियाणे, खतांच्या खरेदीसह शेतीच्या इतर कामांसाठी लागणार्या खर्चाकरिता शेतकर्यांना कृषीकर्ज वाटपाचे उद्दिष्ट सहकार विभागाने निश्चित केले आहे. त्यात गेल्यावर्षीपेक्षा वाढ केली असून यावर्षी १४६ कोटी ४४ लाख रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. कृषी विभागाने सन २०१४-१५ च्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील जमिनीच्या क्षेत्रनिहाय विविध पिकांच्या लागवडीसाठी नियोजन केले आहे. यात भातपिकाचे सरासरी क्षेत्र १ लाख ८४ हजार ९०० हेक्टर असून इतर पिकांचे मिळून यंदाचे नियोजित लागवड क्षेत्र १ लाख ९० हजार हेक्टर राहणार आहे. शेतीच्या मशागतीची कामे शेतकर्यांनी सुरू केली आहे. रबीचा धान आता निघाला असल्यामुळे पुन्हा जमिनीची मशागत करून जमीन सुपीक होण्यासाठी खत टाकणे सुरू आहे. लवकरच बियाण्यांची खरेदी सुरू होईल. या सर्व खर्चाचे नियोजन करताना शेतकर्यांना बरीच कसरत करावी लागते. त्यासाठी शेतकर्यांच्या हाती पैसा राहावा म्हणून जिल्हा उपनिबंधकांनी यावर्षीच्या कृषी कर्जवाटपाचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी बँकांना दिले होते. त्यानुसार बँकांनी केलेल्या नियोजनात एकूण १४६ कोटी ४४ लाखांच्या कर्जवाटपाचे उद्दीष्ट ठरविण्यात आले. त्यात सर्वाधिक ७५ कोटी ८६ लाख कर्जवाटपाचे उद्दीष्ट गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला, त्याखालोखाल ४२ कोटी ७९ लाख विविध व्यावसायिक बँकांना तर २७ कोटी ७९ लाखांच्या कर्जवाटपाचे उद्दीष्ट विदर्भ कोकण ग्रामीण बँकेला देण्यात आले आहे.
१४६ कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट
By admin | Updated: May 27, 2014 00:55 IST