परसवाडा : आपण सत्तेत असलो किंवा नसलो तरी ना. प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून राजकारण न करता समाजकारणाचे काम करीत आहोत. खोटे आश्वासन देणे आमची संस्कृती नाही. शेतकऱ्यांसमोर भारनियमानाची समस्या उभी आहे. चांगले दिवस येणार, असे सांगून सत्ता मिळविणारे आता भारनियमाबाबत काहीच बोलत नाही. ते सत्तेत नसताना खूप मोर्चे काढून गरजत होते, आता त्यांचा आवाजही येत नाही, असे प्रतिपादन आ. राजेंद्र जैन यांनी केले.गोंदिया जि.प. स्वदेशी खेळोत्तेजक मंडळांतर्गत तिरोडा तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव बेरडीपार येथे पार पडले. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.उद्घाटन आ. राजेंद्र जैन यांच्या हस्ते जि.प. सदस्य राजलक्ष्मी तुरकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून अदानी पॉवरचे महाव्यवस्थापक शाहू, नगराध्यक्ष गौर, पं.स. सभापती ललिता जांभूळकर, टुंडीलाल शरणागत, डॉ. अविनाश जायस्वाल, डॉ. सुशील रहांगडाले, सुबोध सिंग, मीना पारधी, खंडविकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार, पं.स. चे सर्व पदाधिकारी व शिक्षकवृंद उपस्थित होते.प्रास्ताविक सरपंच प्रकाश ठाकरे, संचालन के.एस. रहांगडाले यांनी तर आभार यू.पी. पारधी यांनी मानले. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी भारनियमनाचा प्रश्न सोडवावा
By admin | Updated: January 25, 2015 23:19 IST