अग्रवाल : सोनबिहरी येथे नालाबांध व सभामंडपाचे भूमिपूजन गोंदिया : जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून परिसरात पेयजल व सिंचनासाठी पाणी संग्रहणाचे आमचे लक्ष्य आहे. ज्या गावांत जास्त पाणी टंचाई असते त्या गावांना सर्वप्रथम लाभ दिला जाणार आहे. मात्र जलयुक्त शिवारची कामे दर्जेदार व लोकोपयोगी ठरावी यासाठी नागरिकांनी या कामांवर नजर ठेवावी असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. तालुक्यातील ग्राम सोनबिहरी येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत १२ लाख रूपयांच्या निधीतून मंजूर सिमेंट नालाबांध तसेच आमदार निधीतून दोन लाख रूपयांच्या सभा मंडपाच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण सभापती विमल नागपूर व पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे प्रामुख्याने होत्या. याप्रसंगी नागपूरे यांनी, तालुक्यातील ग्राम मुरदाडा, वडद, पांजरा, कुडवा, मोगर्रा, मुंडीपार खुर्द, छिपीया सहीत जिल्ह्यात २२ आंगणवाडी इमारत बांधकामाला मंजूरी देण्यात आल्याचे सांगीतले. तसेच लवकरच महिला व विद्यार्थिनींना सायकल व गृहिणींना सिलाई मशिन लवकरच वितरीत केल्या जाणार असल्याचेही सांगीतले. हरिणखेडे यांनीही शासनाच्या योजना प्रत्येक गावात पोहचविण्याचे कार्य पंचायत समिती करीत असल्याचे सांगीतले. याप्रसंगी जिल्हा परिषद कॉंग्रेस गटनेता रमेश अंबुले, सदस्य शेखर पटले, भोमराज चुलपार, पंचायत समिती उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, सदस्य निता पटले, विनीता टेंभरे, सोनबिहरीचे उपसरपंच कृपाल लिल्हारे, झनकारसिंह लिल्हारे, सुंदरलाल लिल्हारे, ग्रामपंचायत सदस्य मिना चौखांद्रे, मिरा नागपूरे, पुष्पा लिल्हारे, तुळशी बोहने, गिरजाशंकर बिरनवार, मनोहर लिल्हारे, रायपूरचे सरपंच ओम रहांगडाले, उपसरपंच डॉ. बिसेन व अन्य उपस्थित होते.
जलयुक्त शिवारच्या कामांवर नजर ठेवा
By admin | Updated: March 19, 2017 00:31 IST