तिरोडा : ज्याप्रमाणे शासनाच्या आणेवारी पद्धतीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे शासनाच्या कृषी ओलीत क्षेत्राची व्याख्या बदलावी, अशी आपली मागणी असून याबाबत हिवाळी अधिवेशनात मागणी लावून धरणार असल्याची माहिती आ.विजय रहांगडाले यांनी दिली.तिरोडा क्षेत्रात ३० हजार हेक्टर कृषी क्षेत्र असून त्यात २३ हजार हेक्टर शेतीत खरीप व रबी हंगामात पिक घेतले जाते. ७ हजार हेक्टर शेती कोरडवाहू म्हटल्या जाते. मागील वर्षी धापेवाडा उपसा सिंचन योजनेमध्ये भारनियमनात परिवर्तन करुन सिंचन क्षेत्र वाढविण्यात सफलता प्राप्त करण्यात आली होती.भंडारा-गोंदिया जिल्हा हा लहान तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. या तलावात १५ ते २० दिवसाच्या पावसाची साठवणूक क्षमता असून २५ वर्ष जुनी क्षमता लक्षात घेतली जाते. राजस्व विभागाच्या रेकॉर्डनुसार ७/१२ वर ओलीत क्षेत्र नमूद केले असल्याने विविध योजनांचा लाभ घेता येत नाही. ७/१२ वरील ओलीत क्षमता ही ३ महिने, ६ महिने की १२ महिने याचा उल्लेख नसतो. फक्त १५ दिवस शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देवून महसूल व सिंचन विभाग ओलीत क्षेत्र दाखवून आणेवारी पद्धतीप्रमाणे ओलीत क्षेत्राची सुद्धा फसवणूक करीत आहे. त्यामुळे ज्यांना १५ दिवस पाणी मिळते त्यांना सुद्धा ओलीत समजून विविध योजनांपासून त्यांना वंचित ठेवण्यात येत आहे. मात्र याचे निकष बदलविल्यास शेतकऱ्यांना निश्चितपणे त्याचा फायदा होणार असल्याने आ.रहांगडाले यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उचलून ओलीत क्षेत्राच्या व्याख्येत परिवर्तनाची मागणी करणार असल्याचे आ.विजय रहांगडाले यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)
ओलीत क्षेत्राच्या व्याख्येत सुधारणा करा- रहांगडाले
By admin | Updated: October 15, 2015 02:12 IST