लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे आर्थिक दुर्बल घटकातील गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थ्यांसाठी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या योजनेसाठी दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून विशेष प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.
विशेषतः मातंग समाजातील गुणवत्ताधारक, गरजू विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करावा. समाजातील हुशार, होतकरू विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असले तरी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, हा या योजनेचा मुख्य उद्देश असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ एकदाच मिळतो.
कागदपत्रे काय लागतात ?शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, मागील लगतच्या अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिका, पुढील वर्गात प्रवेशाबाबत पत्राच्या स्वयं साक्षांकित केलेल्या छायाप्रती जोडाव्यात, अर्जावर भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे क्रमप्राप्त आहे.
कोणाला किती?
- दहावी : एक हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते.
- बारावी: दीड हजार रुपये शिष्यवृत्तीची रक्कम आह
- पदवी व पदविका उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
- अभियांत्रिकी व वैद्यकीय: क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अडीच हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते.
प्राचार्यांचे हमीपत्रशासनाच्या अन्य शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. याबाबत संबंधित विद्यार्थी, प्राचार्यांचे एकत्रित हमीपत्र जोडणे आवश्यक आहे.
कोणाला लाभ घेता येतो?
- महाविद्यालये-विद्यापीठ शैक्षणिक विभागातील अव्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी
- विद्यार्थ्यांच्या पालकांचे (कुटुंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित) वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे.
- विद्यार्थी भारतीय नागरिक असावा, त्यासाठी नागरिकत्वाचा साक्षांकित दाखला जोडणे आवश्यक आहे.
जिल्हानिहाय निवडशिष्यवृत्तीसाठी कमीत कमी ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची जिल्हानिहाय निवड केली जाते. उपलब्ध निधीच्या मर्यादेत शिष्यवृत्ती एकदाच दिली जाते.
अर्ज कोठे करायचा?अर्ज जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ येथे करावा.