वर्गणीतून शालींचे वाटप : शाळकरी मुलांची अशीही सहृदयतागोंदिया : त्यांचे वय जेमतेम १३ ते १५ वर्षाचे. खेळण्याबागडण्याच्या या वयात सामाजिक भान वगैरे गोष्टी कळतही नाहीत. पण गोंदियातील काही शाळकरी बालकांनी केवळ सामाजिक भान जपलेच नाही तर त्यांना मायेची ऊब देण्यासाठी केलेले काम अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरले आहे. शहरातील विवेकानंद कॉलनी आणि साईनगरात राहणारी ही बालकं आहेत आठवी आणि नववीत शिकणारी. समाजातील रंजल्या गांजल्यांसाठी काहीतरी करावे या सामाजिक जाणीवेतून त्यांनी ‘बिइंग ह्युमन’ हा ग्रुप स्थापन केला आणि आपल्या परिसरात वर्गणी गोळा करणे सुरू केले. पण नेमके काय करता येईल हे ठरले नव्हते. यातच ते आपली शिक्षिका मिनाक्षी साकला यांच्याकडे वर्गणी मागण्यासाठी गेले. साकला यांनीही त्यांना कुतूहलाने या वर्गणीतून नेमके काय करणार, असा प्रश्न त्यांना केला. पण त्यांच्या उत्तराने त्यांचे समाधान झाले नाही. शिक्षिका साकला यांनी त्या बालकांना उघड्यावर थंडीत कुडकुडणाऱ्या लोकांबद्दल सांगून त्यांना ऊब देण्यासाठी शालींचे वाटप करण्याची कल्पना सुचविली. मुलांनाही ही कल्पना आवडली.जमलेल्या पैशातून या मुलांनी १५ शाली आणल्या. खऱ्या गरजूंना त्या शाली मिळाल्या पाहीजे म्हणून रात्री रेल्वे स्थानक गाठले. तेथे उघड्यावर झोपलेल्या काही लोकांना शाली दिल्या. याशिवाई साई मंदिर, हनुमान मंदिरसमोर बसलेल्या असहाय वृद्ध, अपंगांना शाली दिल्या. या बालकांना खरे तर अजून अशाच अनेक लोकांना शालींसोबत इतरही मदत करायची आहे. पण त्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत. आपल्या या ग्रुपशी गोरगरीबांना मदत करू इच्छिणाऱ्या लोकांनी जुळावे आणि शक्य ती मदत करावी अशी या बालकांची इच्छा आहे. त्यांचे हे कार्य सर्वासाठी प्रेरणादायी ठरले आहे.निराश्रितांबद्दल आत्मियता दाखवून लहान वयात असा सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या या बालकांमध्ये रोहीत कोसरे, दीप खंडेलवाल, योगेश चौधरी, बादल कुंभलकर, यश कोसरे, यश रहांगडाले या बालकांचा समावेश आहे. कोणाला त्यांच्या या कार्यात मदत करायची असेल तर त्यांनी ९९२३१४२०५५ या क्रमांकावर संपर्क करावा असेही आवाहन त्यांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
निराश्रितांना दिली त्यांनी मायेची ऊब
By admin | Updated: December 26, 2015 01:55 IST