लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अर्ध्या शहराला गेल्या दोन दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दर पंधरा ते वीस दिवसांनी गढूळ पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण होत असल्याने शहरातील नळ कनेक्शनधारक त्रस्त झाले आहेत.
गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागांतर्गत तालुक्यातील डांगोर्ली येथे वैनगंगा नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. प्राधिकरणाचे शहरात जवळपास १२ हजारांवर नळ कनेक्शनधारक असून, त्यांना प्रति व्यक्ती १३५ लिटर याप्रमाणे दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन ही काही भागांत जीर्ण झाली आहे. त्यामुळे त्यातून बरेचदा गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. ही पाइपलाइन १९७२ मध्ये टाकण्यात आली आहे.
त्यामुळे ती आता बदलण्याची गरज आहे. तर काही भागांतील पाइपलाइन ही नवीन टाकण्यात आली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून शहरातील शास्त्री वॉर्ड, सिव्हिल लाईन, छोटा गोंदिया यासह इतर भागांतील नळ कनेक्शनधारकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. हे पाणी पिण्यायोग आणि इतर कामांसाठी सुद्धा वापरण्यायोग्य नाही. त्यामुळे नळ कनेक्शनधारकांना खासगी विहिरी आणि बोअरवेलवर धाव घ्यावी लागत आहे. नळ कनेक्शनधारकांनी याची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे सुद्धा तक्रार केली आहे.
नवीन योजना कार्यान्वित होईपर्यंत समस्याशहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन २३७ कोटी रुपयांची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पाच पाणी टाक्या आणि पाइपलाइन बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यानंतर ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याचे मजिप्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.