राजकुमार बडोले : आजपासून होणार लाईफलाईनच्या आरोग्य सेवेसाठी नोंदणीगोंदिया : आपला जिल्हा मागास, दुर्गम व आदिवासीबहुल आहे. जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांकसुद्धा फार कमी आहे. त्यामुळे गोरगरीब व गरजू रुग्णांना खाजगी उपचार करून घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. जिल्ह्यातील जास्तीत जास्त गोरगरीब व गरजू रुग्णांना लाईफ लाईन एक्सप्रेसच्या आरोग्य सेवेचा लाभ मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली.बुधवारी राज्य सरकारच्या मदतीने इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशनद्वारा संचालित लाईफलाईन एक्सप्रेसच्या आरोग्य सेवेचे औपचारिक उद्घाटन पालकमंत्री बडोले यांनी लोकोशेडजवळ फित कापून केले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी सी.एल.पुलकुंडवार, क्युरादेव फार्माचे सहायक महाप्रबंधक अशोक बियाणी, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.संजय जायस्वाल, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.समाजकल्याण सभापती देवराज वडगाये, भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हेमंत पटले, जि.प.माजी उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ.वैभव धाडकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरीश कळमकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय दोडके आदी प्रामुख्याने उपस्थित होते.देशातील अनेक शहरातील विविध आजारांवर शस्त्रक्रिया करणारे नामवंत तज्ज्ञ डॉक्टर येथे आपली सेवा देणार आहेत. सर्वसामान्य गोरगरीब व गरजू रुग्णांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे काम आणि त्यांची सेवा करण्याची संधी लाईफ लाईन एक्सप्रेसच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याचे मान्यवरांनी सांगितले.जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी म्हणाले, ही लाईफ लाईन एक्सप्रेस जिल्ह्यातील जनतेसाठी सुवर्णसंधी आहे. सर्व यंत्रणांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी निश्चय करु न जास्तीत जास्त रु ग्णांना या सेवेचा लाभ मिळवून द्यावा. शस्त्रक्रि येसाठी पात्र रुग्ण शस्त्रक्रियेपासून वंचित राहणार नाही याकडे लक्ष द्यावे, ज्या शस्त्रक्रियेवर खाजगी रुग्णालयात एक ते दीड लाख रु पये खर्च येतो, ती शस्त्रक्रिया येथे मोफत करण्यात येणार आहेत. ही रेल्वेगाडी अर्थात आगगाडी नसून आरोग्यगाडी असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख डॉ.सूर्यवंशी यांनी केला. कार्यक्रमाला वरिष्ठ शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र जैन, भरत क्षत्रीय, सुनील केलनका, अपूर्व अग्रवाल, निर्मल अग्रवाल, मिनू बडगुजर, छत्रपाल तुरकर, डॉ.विनोद वाघमारे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, डॉ.सुवर्णा हुबेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, निसर्ग स्कूलच्या विद्यार्थिनी व नागरिकांची उपस्थिती होती. प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते यांनी तर संचालन डॉ.रेखा सपाटे यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)
आरोग्य सेवेचा लाभ गोरगरिबांना मिळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2016 01:46 IST