गोंदिया : वन आगारातील लाकडांची वाहतूक अधिक सुलभ व्हावी व अवैध वृक्षतोडीला आळा बसावा यासाठी वनविभागाकडून अंमलात येत असलेल्या संगणकीय वाहतूक परवाना (ई-टीपी) प्रयोगात गोंदिया जिल्ह्याला पहिला परवाना मिळाला आहे. तालुक्यातील ग्राम किन्ही येथील कास्तकार उषा चैतरामसिंग सूर्यवंशी या राज्यातील पहिल्या मानकरी ठरल्या आहेत.
वनविभागातील विविध वनोपज, मालकी खसरा प्रकरणातील लाकडे, शासकीय वन आगारातील लाकडांची निकासी करण्याकरिता वाहतूक परवाना ( टीपी) जारी करण्यात येत होते, मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ होत होता. अशात या वाहतूक परवानामध्ये बदल करीत संगणकीय वाहतूक परवाना (ई-टीपी) हा प्रयोग वनविभागाने हाती घेतला. याअंतर्गत, २९ ऑक्टोबर २०२० मुख्य वनसंरक्षक (नागपूर) वेबिनारद्वारे सभेचे आयोजन करून संगणकीय प्रणाली वाहतूक परवानाबाबत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना संगणकाद्वारे माहिती दिली होती. त्यानंतर सोमवारी (दि.११) प्रायोगिक तत्त्वावर वनवृत्त नागपूर येथे मालकी (खसरा) संगणकीय प्रणाली वाहतूक परवाना अंमलात आणला. यामध्ये गोंदिया वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या चमूने संपूर्ण महाराष्ट्रात मालकी (खसरा) प्रकरणातील ग्राम किन्ही येथील कास्तकार उषा चैतरामसिंह सूर्यवंशी यांना पहिला वाहतूक परवाना जारी केला आहे. यासाठी वनक्षेत्र अधिकारी सुशील नांदवटे, क्षेत्र सहायक एस. श्रीवास्तव, वनरक्षक एम. राऊत, के. लिल्हारे, ऑपरेटर आर. भालाधरे व वन कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. या संगणकीय परवानामध्ये सहायक वनसंरक्षक एस. एस. सदगीर, उपवनसंरक्षक कुलराज सिंग, मदतनीस योगेश काळे, संगणक तज्ज्ञ मुख्य वन संरक्षक एस. के. त्रिपाठी यांनी मार्गदर्शन केले.
....
अल्प कालावधीत मिळणार आता ई-टीपी
या प्रणालीमुळे आता कास्तकार, व्यापाऱ्यांना कमी वेळेत कोणत्याही गावातून संगणकीय प्रणालीद्वारे अर्ज करून व विहित फी भरून तत्काळ ई-टीपी प्राप्त होणार आहे. या वाहतूक परवान्यामध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड किंवा खाडाखोड करता येत नाही. यात एक क्यूआर कोड (बारकोड) दिलेला आहे त्यामुळे तत्काळ संगणकीय वाहतूक परवान्याची सत्यता पडताळण्यासाठी उपयोग होईल. तसेच ती प्रत खराब झाल्यास त्वरित प्रिंट काढता येणार आहे.