जवरीच्या तंमुसचे आवाहन: शासनाने गोहत्येवर बंदी घालावीगोंदिया : कृषिप्रधान भारत देशात गाईला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. मात्र दुसरीकडे गार्इंची कत्तल करून मांस विकणे जोमाने सुरू आहे. या व्यवसायाकडे मात्र पोलीस विभाग डोळेझाक करून व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देत असल्याचा नागरिकांचा समज आहे. त्यामुळे गोहत्या होऊ देणार नाही. कसायाला गाय विकणार नाही, अशी शपथ प्रत्येक शेतकऱ्याने घ्यावी, असा निर्धार जवरी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती व सरपंच ईश्वरदास पाथोडे यांनी केला आहे.जिल्ह्यातील प्रत्येक धान उत्पादक शेतकऱ्याकडे गाई-म्हशी, शेळ्या ही जनावरे आहेत. जिल्ह्यात बहुतांश आदिवासी जमातीतील लोकांकडेही गाई आहेत. ज्या गार्इंची म्हातारपणाकडे वाटचाल होते, त्यांना पैशाच्या मोहापायी अनेक शेतकरी कमी किमतीत कसायांना विकत आहेत. म्हातारी गाय मेली तर पैसेही मिळणार नाही. मग कमी किमतीत का होईना, हे गृहीत धरून त्या गाईला कसायाच्या हातात टाकतात. कसाई गार्इंना सरळ कत्तलखान्याकडे पाठवून मालामाल होत आहेत. गोहत्या करण्यावर शासनाची बंदी असली, तरीही याची अंमलबजावणी गृह विभागांतर्गत चालणाऱ्या पोलीस विभागाकडून होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.गोहत्या बंदीसाठी सर्व शेतकऱ्यांना जागरूक व्हावे अशी प्रखर भावना जवरी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. गोपालकांनी त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. गोंदिया जिल्ह्याच्या आठही तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात गार्इंना कत्तलखान्यात विक्री करण्यात येते. मात्र, पोलीस क्वचितच या जनावरांना वाहून नेणारे ट्रक जप्त करतानाचे चित्र दिसून येते. या सर्व प्रकरणात बजरंग दलाचे कार्यकर्ते किंवा पोलीस एकमेकांवर नेहमीच आरोप-प्रत्यारोप करतात. मात्र, गोपालकाने आपली गाय पैशाच्या हव्यासापोटी कसायाला विकलीच नाही, तर ती गाय कत्तलखान्यात जाणारच नाही यासाठी जवरी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने गोहत्या बंद करावी, ही मागणी करीत कोणत्याही शेतकऱ्याने आपली गाय कसायाला विकू नये, असे आवाहन केले आहे.(तालुका प्रतिनिधी)
कसायाला गाय न विकण्याची शेतकऱ्यांनी शपथ घ्यावी
By admin | Updated: February 8, 2016 01:55 IST