लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वातावरणातील बदलाचा शेतीवर झपाट्याने होत आहे. मागील तीन चार वर्षांपासून पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. यंदा सुरुवातीपासून पावसाने पाठ फिरविल्याने खरिपातील रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. जुलै महिना संपत आला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधी सरासरी १३२७ मीमी पाऊस पडतो. ऐवढा पाऊस धान लागवडीसाठी अनुकुल मानला जातो. त्यामुळेच जिल्ह्यात धानाची सर्वाधिक लागवड केली जाते. यंदा एकूण १ लाख ७७ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाणार आहे. त्यापैकी २७ जुलैपर्यंत ७१ हजार हेक्टरवर धानाची रोवणी पूर्ण झाली असून अजून १ लाख १० हजार हेक्टरवरील रोवणी शिल्लक आहे. जुलै महिना संपत आला तरी अद्यापही पावसाने मागील वर्षीची सुध्दा सरासरी गाठली नाही. परिणामी सुरू असलेल्या धानाच्या रोवण्या देखील पूर्णपण खोळंबल्या आहे. पावसाअभावी रोवण्या लांबत असल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावित आहे. तर दुसरीकडे ७१ हजार हेक्टरवर केलेल्या रोवण्या सुध्दा पावसाअभावी वाळण्याच्या मार्गावर आला आहे. रोवणी केलेल्या धानाच्या बांध्यामध्ये आतापासूनच भेगा पडण्यास सुरूवात झाली असून उन्ह देखील चांगलेच तापत असल्याने शेतकºयांच्या समस्येत आणखी भर टाकली आहे. मागीलवर्षी देखील पावसाअभावी रोवण्या खोळंबल्या होत्या. तर याच कालावधीत ३२ हजार ६१६ हेक्टरवर रोवण्या झाल्या होत्या. त्यातुुलनेत यंदा रोवण्या जास्ती झाल्या असल्या तरी दमदार पावसाअभावी नदी, नाले, बोड्या कोरड्या पडल्या असल्याने समस्येत वाढ झाली आहे. सिंचन प्रकल्पाच्या पाण्याच्या मदतीने सध्या केलेली रोवण्या वाचविण्याचे काम सुरू आहे. एकंदरीत पावसाच्या अनिश्चिततेमुळे जिल्ह्यावर कोरडा दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.पावसाची वाढली तूटजिल्ह्यात १ जून ते २७ जुलै दरम्यान सरासरी ५५१.७३ मीमी पाऊस पडतो. मात्र त्या तुलनेत यंदा केवळ २९८.२९ मीमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या २९३.५१ मीमी पाऊस कमी पडला आहे. दोन महिन्यातच पावसाची जवळपास ४५ टक्के तूट निर्माण झाली आहे. तर आॅगस्ट महिन्यानंतर पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. त्यामुळे महिनाभरात पाऊस सरासरी गाठणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाची तूट वाढत चालली असल्याने कोरड्या दुष्काळाचे सावट सुध्दा अधिक गडद होत चालले आहे.सिंचन प्रकल्पात २५ टक्केच साठाजिल्ह्यातील शेतकऱ्यांची मदार बऱ्याच प्रमाणात सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर अवलंबून असते. मागीलवर्षी शेवटी शेवटी चांगला पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा पुरेसा पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे रोवणीसाठी या सिंचन प्रकल्पांचे पाणी यंदा सोडता आले. सध्या स्थितीत जिल्ह्यातील मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. इटियाडोह २६ टक्के, सिरपूर २५ टक्के, पुजारीटोला २२.९६ टक्के, कालीसरार ०० टक्के पाणीसाठा आहे.
रोवणी वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडमागील दोन महिन्यापासून जिल्ह्यात पाऊस पाठ दाखवित असल्याने त्याचा धानाच्या रोवणीवर परिणाम झाला आहे. ज्या शेतकºयांनी सुरुवातीला त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सिंचनाच्या सोयीच्या मदतीने रोवणी आटोपली.पण मागील वीस दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला असल्याने केलेली रोवणी वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड सुरू असल्याचे चित्र आहे.
आठ दिवसात पाऊस न झाल्यास स्थिती गंभीरजिल्ह्यात येत्या आठ दहा दिवसात दमदार पाऊस न झाल्यास जिल्ह्यात पिकांची गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी केलेली रोवणी वाळत चालली आहे. तर दुसरीकडे रोवणी करण्याचा कालावधी हळूहळू निघून जात असताना १ लाख १० हजार हेक्टरवरील रोवण्या शिल्लक असल्याने शेतकऱ्यांच्या समस्येत अधिक वाढ झाली आहे.