ठिकठिकाणी तारांबळ : ऐन हंगामात धान विक्रीवर परिणामगोंदिया/बोंडगावदेवी : जिल्हाभरातील ४०० तलाठी आणि ३३ मंडळ अधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे ऐन धान विक्रीच्या या हंगामात ठिकठिकाणी शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. काही ठिकाणी कार्यालयीन कामकाजासाठी तहसीलदारांनी पर्यायी व्यवस्था केली असली तरी धान विक्रीसाठी लागणारे सातबारा मिळणे कठीण झाले आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील २७ तलाठी साझ्यातील २२ तलाठी व ५ मंडळ अधिकारी १६ नोव्हेंबरपासून प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सामूहिक रजेवर गेले आहेत. कार्यरत तलाठ्यांनी तलाठी कार्यालयाला कुलूप लावून सीलबंद लिफाफ्यात चाब्या भरुन तहसीलदाराकडे सुपूर्द केल्या. बुधवारपासून तलाठी कार्यालय कुलूपबंद असल्याने गावातील शेतकरी कमालीचे अडचणीत सापडले आहेत. मंडळ अधिकारी व तलाठी सामूहिक रजेवर गेल्याने ऐन धान विक्रीच्या हंगामात शेतकरी बांधव मात्र मोठ्या धर्मसंकटात सापडल्याचे चित्र अर्जुनी तालुक्यात सर्वत्र दिसून येत आहे. दिवस-रात्र काळ्या कसदार जमिनीत घामाच्या धारा गाळणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीसाठी धावून येणारा ‘भूमिपूत्र’ राजा विरळ होत चालला आहे.राज्यातील तलाठी व मंडळ अधिकारी समन्वय महासंघाने ई-फेरफार मधील अडचणी, शेडनेट कनेक्टीव्हिटी, स्पीड, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय बांधून देणे, थकीत घरभाडे मंजूर करणे इत्यादी मागण्या संबंधाने आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनांतर्गत राज्यातील संपूर्ण तलाठी दि.१६ पासून बेमुदत संपात (सामूहिक रजा) सहभागी झाले आहेत. तालुक्यातील २७ तलाठी कार्यालय व ५ मंडळ अधिकारी कार्यालय कुलूप बंद झाली. गावातील तलाठी कार्यालय बंद झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. संपूर्ण दिवसभर तलाठी कार्यालयातून कोणताही दस्तऐवज खातेदार शेतकरी व सामान्य जनतेला मिळणे दुरापास्त झाले आहे. तलाठ्यांच्या मागणी संबंधाने गेल्या १५ दिवसापासून त्यांचे आंदोलन सुरू असून शासन स्तरावर कणताही तोडगा न निघाल्याने अखेर दि.१६ पासून तलाठी कार्यालयाला कुलूप लावून बेमुदत संपावर जाण्याचा पवित्रा घेतल्याने शेतकरी बांधव ‘कोंडीत’ सापडलेला दिसत आहे. वारंवार नापिकीने सर्वत्र शेतकरी आत्महत्येचे प्रकार दिवसेंदिवस घडत आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या घरामध्ये धानाचे पिक आले आहे. शासकीय हमीभाव धान केंद्रावर आधारभूत किंमतीने धानाची विक्री करताना शेतीचा ‘सातबारा’ अतिआवश्यक करण्यात आला आहे. शासनाचा आधारभूत भाव मिळावा म्हणून शेतकरी बांधवांनी मोठ्या लगबगीने धानाचा चुरणा करुन घरी धान साठवले. घरातील दैनंदिन गरजा भागविण्यासाठी धानाची विक्री करण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्यायच उरला नाही. धानाची विक्री करण्यासाठी सात-बाराची अट आहे. परंतु कालपासून शेतकऱ्यांना तलाठ्याकडून सातबारा मिळणे बंद झाल्याने शेतकरी बांधव कैचित सापडला आहेत. सातबाराअभावी मातीमोल भावानी शेतकऱ्यांच्या दारात उभे राहून नाईलाजास्तव धानाची विक्री करून आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. एकंदरित ग्रामीण जनता तलाठ्याअभावी ऐन शेतीच्या हंगामात अडचणीत सापडल्याचे चित्र तालुक्यात सर्वत्र दिसून येत आहे. (वार्ताहर)तहसीलदारांनी केली पर्यायी व्यवस्थाशेतकऱ्यांनी होणारी अडचण लक्षात घेता तालुका प्रशासनानी कोणती व्यवस्था केली अशी विचारणा केली असता तहसीलदार प्रशांत घोरुडे यांनी सांगितले की, तलाठी साझ्यातील कोतवाल २४ तास मुख्यालयात हजर राहून शेतकरी व सामान्य जनतेला जे सातबारा, दाखले लागतात ते भरुन स्वाक्षरी करण्यासाठी नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांकडे ३ वाजेपर्यंत तहसील कार्यालयात आणावे. लगेच ३.३० वाजे सध्या झालेले दाखले घेवून संबंधितांना द्यावे, असे आदेश आज (दि.१७) दिल्याचे सांगितले.
तलाठ्यांचे सामूहिक रजा आंदोलन
By admin | Updated: November 18, 2016 01:44 IST