बोंडगावदेवी : मानव हा समाजशील प्राणी आहे. मानवाच्या सर्वांगिन प्रगतीसाठी सुंस्कारित समाजाची नितांत गरज आहे. समाज एकत्रित येवून सुसंघटीत झाला तरच प्रगतीच्या शिखरावर जाणे शक्य आहे. सामुदायिक उत्सवाच्या माध्यमातून विखुरलेल्या माळी समाजबांधवानी एकत्र यावे. अशा उपक्रमांनी समाज बांधवामध्ये स्नेहाचे नाते घट्ट होऊन विचारांचे आदान-प्रदान होते. समाजातील वंचित लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याची किमया समाज संघटनेच्या माध्यमातून सहज केली जावू शकते, असे प्रबोधन पशूचिकित्सक डॉ. डांगोरे यांनी केले. माळी समाज तालुका अर्जुनी-मोरगावच्या वतीने शरद पौर्णिमा उत्सव, माळी समाज मनोमिलन तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अमर मांडगवणे यांच्या वाड्यात बुधवारी आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माळी समाज संघटनेचे अध्यक्ष डॉ. कैलाश गाडेकर होते. अतिथी म्हणून डॉ. डांगोरे, प्रा. कावळे, तंमुसचे अध्यक्ष तथा संघटनेचे उपाध्यक्ष तुळशीदास बोरकर, आनंद लांजेवार, अर्चना झेलकर, विजय आरेकर, अमर मांडवगणे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेसमोर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. या वेळी समाजबांधवाना मार्गदर्शन करताना मान्यवर म्हणाले, भारताचे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना गुरू मानले. शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा, असा कानमंत्र त्यांनी दिला. सावित्रीबाईच्या पुण्याईने आज महिलांना समाजात महत्त्वाचे स्थान मिळाले व त्यांनी गरूड झेप घेतली. समाजबांधवांनी शिक्षणप्रेमी बनून प्रगती करण्यासाठी पुढे यावे. आरक्षण बंद होण्याच्या हालचाली सुरू आहेत. अशाप्रसंगी माळी समाजाने एकत्र येऊन संघर्ष करण्यासाठी तत्पर रहावे, असे आवाहन केले. कार्यक्रमात दहावी व बारावीमध्ये माळी समाजामधून गुणवत्ता प्राप्त करणारे पियुष आदे, आकांक्षा झेलकर, गोमती मंदुरकर, नेहा मांडवगणे, केविल इरले, आयुषी झेलकर, निखिल गायधने या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवान्वित करण्यात आले. समाजकार्यात महिलांचा सहभाग असावा यासाठी रात्री महिलांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले.संचालन गोटाफोडे व आभार पात्रीकर यांनी मानले. स्नेहभोजन व परस्पर भेटीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. (वार्ताहर)
माळी समाजाचे मनोमिलन व सत्कार
By admin | Updated: October 31, 2015 02:43 IST