गोंदिया : बारावीचे निकाल लागल्यामुळे महाविद्यालयीन प्रवेशाची लगीनघाई सुरू झाली आहे. आवश्यक ती कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयाकडे धाव घेतली आहे. जातीच्या दाखल्यांसह विविध कागदपत्रांमुळे सेतू कक्षात विद्यार्थी व पालकांची झुंबळ दिसून येत आहे. मात्र सेतू केंद्रामध्ये जनरेटरची व्यवस्था नसल्याने भारनियमनाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. एवढेच नव्हे तर ठिकठिकाणच्या सेतू केंद्रामध्ये भ्रष्टाचाराचे पेव फुटले आहे. १२ वी हा शैक्षणिक जीवनातील महत्वपूर्ण टप्पा समजला जातो. बारावीनंतर आपल्या आवडीच्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी वाटचाल सुरू होते. बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला व निकालपत्रकांचेही वाटप झाले आहे. निकालपत्रक हातात पडल्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशाचे वेध लागले आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान व आदी विभागाचे प्रवेश सुरू झाले आहेत. प्रवेशासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे लागत असतात. मेडीकल, इंजिनिअरिंगसह इतर वेगळ्या क्षेत्रात करिअर करणाऱ्यांनादेखील अनेक कागदपत्रांची गरज भासते. बारावीचा निकाल लागल्यामुळे जवळजवळ सर्वांचेच पुढील नियोजन तयार झाले आहे. नुकताच सीईटीचा निकालही जाहीर होणार आहे. अशा परिस्थितीत ऐन प्रवेशाच्या वेळी कापदपत्रासाठी ओढताण होवू नये म्हणून तहसील आवारात कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी दिसून येत आहे. मे महिन्यात सुटी असल्यामुळे शांत झालेल्या तहसील कार्यालय जून महिना उजाडताना पुन्हा गजबजू लागला आहे. शासनाने महसूल विभागाच्या विविध कामासाठी नागरिकांची धावपळ होवू नये म्हणून सेतू केंद्र उभारले. सदर सेतू केंद्र संस्थेच्या मार्फत चालविण्यात येत आहे. गोंदिया येथील सेतू केंद्रात चार संगणक लावण्यात आले आहेत. दोन कॅमेरे आहेत. परंतु चार संगणकावर काम न करता फक्त दोनच संगणकाचा वापर केला जात आहे. तर उर्वरित संगणक शोभेचे वस्तू म्हणून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रमाणपत्रांसाठी तासनतास तातकळत विद्यार्थी व पालकांना उभे राहावे लागते. एका कागदपत्रासाठी विद्यार्थी व पालकांना दोन-दोन दिवस सेतू केंद्राच्या हेलपाट्या माराव्या लागतात. एकीकडे प्रवेशाची घाई तर दुसरीकडे महसूल विभागाचा नाकर्तेपणा या दोन्ही बाबी विद्यार्थी व पालकांना भेडसावत आहेत. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली असून तहसील आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. अर्ज व्यवस्थित न भरल्यामुळे तहसील कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागतात. यामुळे दलालांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची लूट होत असल्याचे दिसून येत आहे. अर्ज भरण्यासाठी फी वर बंधन नसल्यामुळे १०० पासून तर ५०० रुपयांपर्यंत फी वसूल केली जात आहे. सेतू सेवा केंद्र हे जनतेच्या सोयीसाठी उभारण्यात आले असले तरी आज हे केंद्र जनतेच्या लुटीचे साधन ठरले आहे. अधिकाऱ्यापासून तर वेंडरांपर्यंत सर्वच जण नागरिकांकडून पैसे उकाळण्याचा प्रयत्न करीत असतात. सध्या महाविद्यालयीन कागदपत्रांसाठी गर्दी असल्याने तहसील कार्यालयासह सेतू सेवा केंद्राला सुगीचे दिवस आले आहे. गर्दीचा फायदा उचलून शिपाई एकेका सहीसाठी ५० ते १०० रुपयांची मागणी करीत असून त्यांचा धंदा जोमात सुरू आहे. दरम्यान, शिपायांच्या या दादागिरीची तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यास विद्यार्थ्यांच्या कागदपत्राला ब्रेक लावण्यात येतो. कमाईतील २५ टक्के रक्कम ही अधिकाऱ्यांना रीतसर पोहचत असल्याचे सूत्रांकडून कळले. बेरोजगार विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण थांबविण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
सेतू केंद्रांना भ्रष्टाचाराचे ग्रहण
By admin | Updated: June 23, 2014 23:57 IST