साखरीटोला : शासनाने शेतीकरिता जल सिंचनाच्या विविध योजना कार्यान्वीत केल्या. जेणेकरून शेतकरी शेतीच्या उत्पादनात वाढ करून आपली आर्थिक स्थिती मजबूत करू शकेल. यात काही शेतकर्यांनी मोठय़ा प्रमाणात फायदा घेतला तर अजूनही बरेच शेतकरी योजनांपासून वंचित आहेत. मात्र हरदोली येथील एका महिला शेतकरीने शेततळ्याचा जल सिंचनाकरिता उपयोग करून केवळ एका एकरात भाजीपाल्याच्या उत्पादनात लाखोची मिळकत घेतली आहे. शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकर्यांना शेततळ्याचा सिंचनासाठी उपयोग व्हावा म्हणून शेततळे बांधून दिली जातात. त्या अंतर्गत निर्मला चरणदास बोम्बार्डे हरदोली ता. देवरी या महिला शेतकर्यांनी ३0 फूट चौरस भागात शेततळीचे खोदकाम केले. पाणी अडवा, पाणी जिरवा या म्हणीनुसार त्या शेततळ्यात पाणी अडवून त्या तळ्याच्या साहाय्याने आपल्या एक एकर जागेत विविध प्रकारचा भाजीपाल्याची लागवड केली. त्यामुळे त्यांना बराच फायदा झाला. सन २0११-१२ मध्ये चवळीच्या शेंगा, उन्हाळी, वाल, मका, टमाटर व विविध भाजीचे उत्पादन घेतले. सन २0१२-१३ मध्ये टरबूज, मका, टमाटर, मिरची तर सन २0१३-१४ मध्ये हरभरा, मका, चवळी शेंगा, टमाटर, भुईमूंग, मिरची अशा विविध भाज्यांचे उत्पादन काढले. शेततळीमध्ये २५ किलो मोठी मत्स्य वीज टाकण्यात आले. त्यामुळे मत्स्य उत्पादन सुध्दा घेण्याकरिता मदत झाली. या तिन्ही वर्षात १ लाख २0 हजार रुपये अंदाजे नफा झाल्याचे तिने सांगितले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात कोथिंबीर, कारलेचे उत्पादन घेतले जात आहे. प्रायोगिक तत्त्वावर बांबू, नेट खरेदी करून हरितगृह तयार करण्यात आले आहे. सदर शेतकरी महिलेने २ हजार रुपये खर्च करून ६0 बाय ३0 फुटाचे नेट हाऊस तयार करण्यात आले. विशेषत: हा ज्या जागवर गुरेढोरे चरत होते. अशा नापिकी जमिनीवर सदर शेतकरी महिलेने शेततळ्याच्या भरवशावर हिरवळ तयार करून स्वत:च्या मेहनतीने भाजीपाल्याचे उत्पादन केले. ‘पाणी त्याची बाणी’ या युक्तीप्रमाणे पुढे याच ठिकाणी केळीची बाग व फुलशेती करण्याचा निर्धार केला आहे. शेततळे बहुतांश शेतकर्यांसाठी वरदान ठरलेले आहे. सदर शेतकरी महिलेला शासकीय मदत व मार्गदर्शन कृषी पर्यवक्षक प्रकाश मेश्राम देवरी, पर्यवेक्षक जिभकाटे, पारधी, कु.डी. गौतम, कृषी सहायक तिडके यांनी वेळोवेळी यांनी केली आहे. कृषी अधीक्षक गोंदिया यांनी अनुदान तत्त्वावर नेट व काटेरी कुंपणाची योजना द्यावी, अशी मागणी आदर्श शेतकरी होऊ पाहणार्या निर्मला चरणदास बोम्बार्र्डे यांनी केली आहे. (वार्ताहर)
शेततळे योजना ठरली शेतकर्यांसाठी वरदान
By admin | Updated: May 25, 2014 23:41 IST