लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भारत फायनान्शिअल इन्क्लुजन लिमिटेड शाखा अर्जुनी मोरगाव येथे मॅनेजर पदावर काम करताना कर्जवाटप वसुलीचे काम असणाऱ्या आरोपीने तब्बल १९ कर्जदारांचे ४ लाख ३६ हजार रुपये वसूल करूनही ते शाखेत जमा केले नाही. अमरदीप भाऊदास पिलघर (३०, रा. असलपाणी ता. तुमसर, जि.भंडारा) असे अपहार करणाऱ्या मॅनेजरचे नाव आहे. त्याच्यावर २६ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्जुनी मोरगाव येथील भारत फायनान्शिअल इन्क्लुजन लिमिटेड कंपनीचे मॅनेजर अमरदीप भाऊदास पिलघर (३०, रा. आसलपाणी) याने ११ एप्रिल २०२४ ते १३ ऑगस्ट २०२४ यादरम्यान मॅनेजर पदावर काम करत असताना कर्जदारांना वाटप केलेल्या रकमेची वसुली करण्याचे काम त्यांच्याकडे होते. त्याने १९ कर्जदारांकडून घेतलेले ४ लाख ३६ हजार ९२३ रुपये शाखेमध्ये जमा न करता कंपनीचा विश्वासघात करून स्वतः वापरले. या घटनेसंदर्भात गणेश प्रभू भोंगाडे (३०, रा. धामनगाव) यांच्या तक्रारीवरून अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी दि. २६ मे रोजी आरोपीवर भारतीय न्यायसंहिता कलम ३१८, (४), ३१६ (२), ३१६ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक किरण मेश्राम करीत आहेत.