गोंदिया : एका विवाहित तरुणाने पहिल्या पत्नीकडून घटस्फोट न घेता बालाघाटहून गोंदिया येथे पळून येत दुसऱ्या महिलेसह विवाह करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती तरुणाच्या पत्नीला होताच तिने गोंदिया गाठून विवाह होत असलेल्या ठिकाणी धडक दिली. यामुळे विवाह मंडपात एकच तारांबळ उडाली. यानंतर नरदेव तरुण थेट मंडपातून त्या महिलेला घेऊन पसार झाला. ही घटना बुधवारी (दि.४) गोंदिया येथे घडली. याप्रकरणी पत्नीने रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.
रामनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीनुसार पत्नीचे नाव रश्मी सहारे असून तिच्या पतीचे नाव रमेश सहारे आहे. ती बालाघाट येथील बुढी परिसरातील रहिवासी आहे. तिचा विवाह २१ जानेवारी २०१४ रोजी जोगीलाल सहारे यांचा मुलगा रमेश सहारे याच्यासह सर्व रीतिरिवाजानुसार झाले. लग्नाच्या काही वर्षांनी,माझ्या पतीने आणि त्याच्या नातेवाइकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर मी माझ्या पती आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाच्या माध्यमातून मला पोटगी देखील मिळत आहे. माझ्या पतीने घटस्फोटाचा खटला देखील दाखल केला होता तो न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यानंतर ४ जून २०२५ राेजी माझा पती मला घटस्फोट न देता बालाघाट येथील एका महिलेसोबत गायत्री मंदिर रामनगर येथे लग्न करत असल्याची माहिती मला मिळाली. मी माझ्या नातेवाइकांसह गायत्री मंदिरात पोहचली. तिथे माझे पती रमेश सहारे यांचे नातेवाईक उपस्थित होते. मी तिथे पोहोचल्यानंतर लग्न थांबविल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पतीच्या बहिणींनी करीत होत्या मदत
पत्नी असूनही दुसरे लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे. हे माहिती असून सुद्धा तिच्या नवऱ्याच्या बहिणी दुसऱ्या लग्नासाठी भावाला सहकार्य करीत असल्याचे पत्नीने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
"या संदर्भात पीडित महिलेची तक्रार प्राप्त झाली असून तिने तक्रार करताच विवाहस्थळी जाऊन चौकशी केली असता तिथे कुणीच आढळले नाही. तक्रारीनुसार या प्रकरणाची चौकशी सुरु असून पुढील कारवाई केली जाईल."- प्रवीण बोरकुटे, ठाणेदार रामनगर पोलिस स्टेशनa