सुधारित कृती आराखडा : यावर्षी १०३ गावांमधील १४ हजार १३१ कुटुंबांना अनुदानमनोज ताजने गोंदियाजिल्ह्यात तब्बल ४० टक्के, अर्थात ९० हजार कुटुंबात वैयक्तिक शौचालय नाहीत. त्यामुळे या नागरिकांना उघड्यावर शौचविधीसाठी जावे लागते. शासनाच्या निर्मल ग्राम योजनेचा फज्जा उडविणारी ही वस्तुस्थिती आहे. मात्र ही स्थिती सुधारण्यासाठी सुधारित वार्षिक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार यावर्षी १०३ गावांमधील १४ हजार १३१ कुटुंबात वैयक्तिक शौचालय बांधण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून निर्मल ग्राम अभियान राबविले जात आहे. गावे हगणदारीमुक्त व्हावेत आणि प्रत्येक कुटुंबात शौचालय बांधून त्याचा वापर व्हावा यासाठी हे अभियान राबविण्यात आले. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून शौचालय बांधणीसाठी अनुदानही देण्यात आले. मात्र गोंदिया जिल्ह्यातील शौचालयांची स्थिती पाहता हे अभियान जिल्ह्यात किती यशस्वी झाले यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.जिल्ह्यात ९० हजार कुटुंबांत अजूनही शौचालय नसले तरी सुधारित वार्षिक कृती आराखड्यानुसार यावर्षी केवळ १४ हजार १३१ कुटुंबात शौचालय बांधण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. यापूर्वी सरसकट कोणालाही शासनाचे अनुदान दिले जात होते. मात्र ‘अॅक्शन प्लॅन’ मधील १०३ गावांमधील दारिद्र्य रेषेवरील सर्वसाधारण गटात मोडणारे कुटुंब सोडून बाकी कुुटुंबांना १२ हजार रुपये प्रतिकुटुंब अनुदान दिले जाणार आहे. त्यात ८ हजार रुपये केंद्र सरकारचा तर ४ हजार रुपये राज्य सरकारचा वाटा आहे.सुधारित कृती आराखड्यानुसार आठही तालुक्यातील १०३ गावांमधल्या ६५८३ बीपीएल कुटुंबांमध्ये शौचालय बांधण्याचे उद्दीष्ट आहे. त्यात एससी प्रवर्गातील ८७४, एसटी ११९० आणि इतर ४५१९ कुटुंबांचा समावेश आहे. याशिवाय एपीएल (दारिद्र्य रेषेवरील) ५८४९ कुटुंबांमध्ये यावर्षी शौचालय बांधणीचे उद्दीष्ट ठरविण्यात आले. सुधारित कृती आराखड्यानुसार यावर्षी सर्वाधिक २८२९ शौचालय बांधण्याचे उद्दीष्ट तिरोडा तालुक्याला देण्यात आले. त्याखालोखाल सालेकसा २८१७, गोंदिया २८०८, गोरेगाव १३५५, आमगाव १३०२, सडक अर्जुनी १२७९, देववी ८७८ तर अर्जुनी मोरगाव तालुक्याला ८६३ शौचालय बांधण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे.
४० टक्के कुटुंब शौचालयांविना
By admin | Updated: October 16, 2015 02:34 IST