सहकार विभागाचा अभियान : कित्येक खातेदारांची अनिच्छागोंदिया : फक्त खातेदार म्हणून संस्थेत असल्याने मिळणाऱ्या सुविधांपासून शेतकरी वंचीत राहतात. मात्र सभासदांप्रमाणेच या खातेदारांना अन्य सुविधा मिळाव्या या उद्देशातून सेवा सहकारी संस्थेत असलेल्या खातेदारांना आता सभासद करण्यासाठी सहकार विभागाकडून अभियान राबविले जात आहे. यांतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत २२५४ खातेदारांना संस्था सभासद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात मात्र खातेदारांची अनिच्छा दिसत आहे. गाव पातळीवर कार्यरत असलेल्या सेवा सहकारी संस्थेतून शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातात. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे ‘कर्ज’ ही असते. यासाठी संबंधीत शेतकरी संस्थेचा सभासद असणे गरजेचे आहे. मात्र माहिती अभावी गावातील शेतकरी सेवा सहकारी संस्थेचे खातेदार तर असतात मात्र ते सभासद नसल्याने कर्जासह अन्य सुविधांपासून वंचीत राहतात. शेतीचा हंगाम येताच या शेतकऱ्यांना कर्जासाठी इतरत्र भटकावे लागते. माहितीचा अभाव असल्याने आपल्या हक्काच्या संस्थेतून मिळणाऱ्या सोयींना ते मुकतात. हा प्रकार संपुष्टात यावा व प्रत्येक शेतकऱ्याला सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून मिळणाऱ्या सोयी प्राप्त व्हाव्या या उद्देशातून सहकार मंत्र्यांनी सेवा सहकारी संस्थेतील खातेदारांना सभासदत्व देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सहकार विभागाकडून विशेष अभियान राबवून सेवा सहकारी संस्थेतील खातेदारांना सभासद करवून देण्याचे कार्य केले जात आहे. साधारण खातेदार असलेले हे शेतकरी संस्थेचे सभासद झाल्यास त्यांना संस्थेकडून हंगामात कर्ज तर मिळणारच. शिवाय संस्थेकडून पुरविण्यात येणाऱ्या अन्य सुविधांसाठीही ते पात्र ठरणार आहेत. त्यानुसार सहकार विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या अभियानांतर्गत २२५४ खातेदारांना संस्थांचे सभासद बनविण्यात आले आहेत. असे असतानाही मात्र आताही ६२ हजार ७२८ खातेदार सभासद बनवयाचे आहेत. मात्र यातही कित्येक सभासदांची अनिच्छा असल्याने या मोहिमेला पाहिजे तसे यश मिळाले नाही. परिणामी खातेदारांना सभासद बनविण्यात आल्याचा आकडा कमी दिसतो. (शहर प्रतिनिधी) माहिती अभावी शेतक री पिछाडले शेतकऱ्यांना शेतीच्या हंगामात पैसा लागतो. अशात सेवा सहकारी संस्थेच्या माध्यामातून कर्ज वाटप होत असले तर हे खातेदार शेतकरी कर्ज वाटपात पात्र ठरत नसून मुकतात. परिणामी इतरत्र उधार-उसनवारी किंवा सावकाराकडून व्याजावर पैसा घेणे हेच पर्याय उरतात. त्याचे परिणामही पुढे जावून शेतकऱ्यांना भोगावे लागतात. हे प्रकार थांबावे व पात्र प्रत्येक शेतकऱ्याला संस्थेकडून सहकार्य लाभावे या व्यापक दृष्टीकोनातून सहकार मंत्र्यांनी खातेदारांना सभासदत्व देण्याचा हा निर्णय घेतला आहे.
२२५४ खातेदार बनले सभासद
By admin | Updated: January 13, 2017 01:01 IST