किशोर शंभरकर नवेगावबांधराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सत्र २०१३-१४ मध्ये प्रवेशबंदी घातलेल्या महाविद्यालयापैकी गोंदिया जिल्ह्यातील ११ महाविद्यालयांना जीवदान मिळाले आहे. तेथील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नसल्याने सर्वांच्याच आशा पल्लवीत झाल्या आहेत.७ जून २०१३ रोजी विद्यापीठाद्वारे अनेक महाविद्यालयावर प्रवेशबंदी लावण्यात आली होती. संपूर्ण वर्षभर विद्यापीठ, शासन व न्यायपालिका स्तरावर प्रवेशबंदी उठवून प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. काही तांत्रिक कारणास्तव सदर प्रयत्नांना पाहिजे तसे यश येऊ शकले नाही. याबाबत सत्र २०१३-१४ मध्ये प्रवेशबंदी घातलेल्या महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रवेश नियमित करुन विशेष परीक्षा घेण्याबाबत शासनाने ११ जून २०१४ रोजी आदेश दिलेत. तसेच २६ जून २०१४ रोजी संपन्न झालेल्या विद्यवत परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार ७ जून २०१३ रोजी विद्यापिठाद्वारे प्रवेशावर बंदी घातलेल्या महाविद्यालयापैकी ज्या ६३ अशासकीय विना अनुदानित महाविद्यालयाने सत्र २०१३-१४ मध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. अशा विद्यार्थ्यांच्या संबंधित महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची अभ्यासक्रम निहाय सविस्तर माहिती प्रतिज्ञापत्रासह १ जुलैपर्यंत विद्यापिठात सादर करावी, असे पत्राद्वारे संबंधीत महाविद्यालयांना कळविण्यात आले. त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील ११ महाविद्यालयाचा समावेश आहे.किरसन्स मिशन इंस्टीट्यूट आॅफ मेनेजमेंट गोंदिया गोरेगाव रोड, व्ही. कौशल्यायन महिला महाविद्यालय देवरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज आॅफ आर्टस्, कॉमर्स अॅन्ड सायन्स सुरतोली/लोहारा, महात्मा फुले कला व विज्ञान महाविद्यालय परसवाडा, यशवंत कला महाविद्यालय आमगाव, रुपलता देवाजी कापगते महाविद्यालय कोकणा (खोबा), स्व. निर्धनराव पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय सौंदड/रेल्वे, चिचगड महाविद्यालय चिचगड, रुखमा महिला महाविद्यालय नवेगावबांध, राजश्री शाहू महाराज कॉलेज आॅफ कॉमर्स सडक/अर्जुनी, एस.आर. बी. महाविद्यालय साकरीटोला या महाविद्यालयाचा यादीत समावेश आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची अभ्यासक्रम निहाय माहिती खालील अटींसह विद्यापीठाला सादर करायची होती. यात यादीनुसार अभ्यासक्रम निहाय प्रवेशित विद्यार्थ्यांची प्रत्येक विषयातील अभ्याशिकेत ७५ टक्के व त्यापेक्षा जास्त उपस्थिती होती. २०१३ -१४ या शैक्षणिक सत्रात वार्षिक पॅटर्नच्या परीक्षेसाठी प्रत्यक्ष शिकवणीचे दिवस १८० पेक्षा कमी नव्हते. तसेच सेमिस्टर पॅटर्नसाठी ९० दिवसांपेक्षा कमी नव्हते. विद्यापीठाच्या विहित नियमानुसार व पात्रतेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहे. सर्व प्रदेश विद्यापीठाने विहित केलेल्या प्रवेशाच्या अंतिम तिथीपूर्वी झालेले आहेत. महाविद्यालयातील कोणतेही प्रवेश नियमबाह्य आढळल्यास यासाठी संस्थेचे प्राचार्य/अध्यक्ष/सचिव जबाबदार राहील. अशा विद्यार्थ्यांना नामांकन व परीक्षेसाठी पात्र ठरविण्यासंबंधी विद्यापीठाने घेतलेला निर्णय बंधनकारक राहील. सदर प्रतिज्ञापत्रातील कोणत्याही बाबी भविष्यात असाच आढळल्यास यासंबंधी होणाऱ्या कोणत्याही कायदेशीर व फौजदारी कारवाईस संस्थेचे प्राचार्य, अध्यक्ष, सचिव पात्र राहतील. सदर माहिती १ जुलैपर्यंत शपथपत्राद्वारे विद्यापिठाचे महाविद्यालयीन शाखेकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील अकरा महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा मार्ग मोकळा होण्याचे सकारात्मक संकेत मिळाले आहेत.
११ महाविद्यालयांना मिळणार जीवदान
By admin | Updated: July 5, 2014 00:54 IST