लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : आजचा भारत बदललेला आहे. बदललेले संपूर्ण तंत्रज्ञान, त्याहूनही युद्ध तंत्रज्ञानातही बदल झालेला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या आधी एक कार्यकर्ता म्हणून मला नेहमीच एक चिंता लागून राहायची. बदलत्या काळातील युद्ध कसं असेल, बदलते ड्रोन, बदलती टेक्नॉलॉजी याबाबत भारत किती तयार आहे. त्याचे उत्तर 'ऑपरेशन सिंदूर'ने दिले. भारत केवळ पाकिस्तानला ठोकायला तयार झालेला नसून भारतामध्ये तयार झालेले तंत्रज्ञान आज अमेरिका आणि चिनी तंत्रज्ञानालाही मात करणारे आहे. आजचा भारत हा गप्प बसणारा, कोणापुढे झुकणारा नसून वेळ आल्यास अमेरिकेलाही चोख उत्तर देणारा महाशक्तिशाली देश आहे, असे उदगार माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी काढले.
फर्मागुडी येथील गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या जीव्हीएम उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहामध्ये चतुरंग प्रतिष्ठान गोवा शाखेतर्फे श्रवणानंद या उपक्रमाच्या अंतर्गत धर्माधिकारी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी धर्माधिकारी यांनी 'ऑपरेशन सिंदूर' या विषयावर आपले विचार मांडले.
हिंदू-मुस्लिम बांधवात फूट पाडण्याचे षड्यंत्र
धर्माधिकारी पुढे म्हणाले की, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी लोकांना धर्म विचारून गोळीबार केला. हे पाकिस्तानचे ठरवून केलेले षडयंत्र असून भारतातील हिंदू व मुस्लिम यांच्यामध्ये फूट घालण्याचे षडयंत्र होते.
मात्र, भारतातील कोणत्याच हिंदू लोकांनी मुसलमान लोकांना मारले नाही. देशातील हिंदू व मुस्लिम हे एकमेकाचे विरोधक बनले नाही. ही आपली खरी संस्कृती आहे. उलट भारत एक ठोस निर्णय घेऊन पाकिस्तानला योग्य धडा शिकवणार याचा विश्वास प्रत्येक भारतीयाला होता व हा विश्वास ऑपरेशन सिंदूरमधून दिसून आला.
सैनिकाने पाकिस्तानमध्ये जाऊन बदलत्या तंत्रज्ञानाच्या जोरावर आपल्या हवाई दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. आधुनिक तंत्रज्ञानातून आपली युद्धातील क्षमता दाखवून दिली. भारतीय सैन्य दलाने आपली सक्षमता संपूर्ण जगाला ऑपरेशन सिंदूरच्या यशातून दाखवून दिली आहे. यापुढे अशा हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय सैन्य सतर्क असल्याचे धर्माधिकारी म्हणाले.
..तर देशाचे बळ वाढेल
भारताला यापुढेही महाशक्तिशाली बनवण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने जागृत राहून हातभार लावण्याची आवश्यकता आहे. आपल्या अवतीभवती कोणत्या गोष्टी घडत आहे यावर गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. कोणत्याही घडामोडीकडे उघड डोळ्यांनी पाहून सावध राहिले तर देशाचे बळ वाढेल, असे माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी म्हणाले. यावेळी कार्यक्रमात गोवा विद्या प्रसारक मंडळाचे कृष्णा शेट्ये हे उपस्थित होते.
आज दुसरे व्याख्यान
अविनाश धर्माधिकारी यांचे दुसरे व्याख्यान आज रविवारी २२ रोजी संध्याकाळी स्पर्धात्मक परीक्षा आणि गोव्याचा सहभाग यावर असणार आहे.