पणजी : सरकार यापुढे विद्यार्थ्यांना टॅब देणे बंद करणार असल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी रविवारी येथे अनौपचारिकरीत्या पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की, टॅब देणे सुरू ठेवण्याची आपल्याला गरज वाटत नाही. टॅब देण्यामागे सरकारचा जो हेतू होता, तो साध्य होत नाही. आणखी टॅब देण्यासाठी म्हणून विद्यार्थ्यांकडून यापूर्वी जे काही नाममात्र शुल्क सरकारकडून घेतले गेले आहे, ते परत देण्याचाही प्रयत्न केला जाईल. कॅसिनोंबाबत ते म्हणाले की, राज्याला कॅसिनोंद्वारे महसूल मिळतो. खाणबंदीमुळे राज्याचा २५ टक्के महसूल कमी झाला. आता कॅसिनोंमुळे तरी राज्याच्या तिजोरीत निधी येतो. यामुळे कॅसिनोंच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा सरकारने विचार करायला हवा, असे मला वाटते. तसेच कॅसिनोंना मांडवी नदीतून खोल समुद्रात पाठविण्याचा किंवा परवाना संपताच ते बंद करण्याचा प्रयत्न सरकारने करावा, असे मला वाटत नाही. हॉटेलमध्ये कॅसिनो सुरू करण्यासाठी एक अर्ज आला आहे; पण आम्ही निर्णय घेतलेला नाही. कॅसिनोंमध्ये बहुतांश देशी पर्यटक जात आहेत. (खास प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना टॅब देणे बंद
By admin | Updated: December 22, 2014 01:50 IST